कपाशीच्या पात्या गळाल्या; सोयाबीनला फुटतील कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 05:00 AM2021-09-12T05:00:00+5:302021-09-12T05:00:25+5:30
यावर्षी पाऊसही चांगला असल्याने आतापर्यंत पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वणी व मारेगाव तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या दोनही तालुक्यांमधील सखल भागात असलेल्या शेतांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन व कपाशीचे पीक चांगले असले तरी हवामान विभागाने आणखी सात दिवस या भागात पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही दिवसांपासून वणी उपविभागात सुरू असलेल्या धुवाॅंधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. हा पाऊस आणखी दोन-तीन दिवस असाच राहिला, तर सोयाबीन व कपाशीवर बुरशीजन्य आजार येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
वणी तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर कपाशीची, तर नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी जून महिन्यातच पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी अगदी वेळेवर पेरण्या आटोपल्या. वणी उपविभागात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. यावर्षी पाऊसही चांगला असल्याने आतापर्यंत पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वणी व मारेगाव तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या दोनही तालुक्यांमधील सखल भागात असलेल्या शेतांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन व कपाशीचे पीक चांगले असले तरी हवामान विभागाने आणखी सात दिवस या भागात पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पाऊसही सुरू आहे. पावसाचे सातत्य कायम राहिल्यास सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटून त्यावर बुरशी येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अतिपावसामुळे कपाशीची बोंडेही सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे सध्या या भागात दमट वातावरण असून, पिकांवरील बुरशीजन्य आजारांसाठी हे वातावरण पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीचे बियाणे पेरले, त्या बियाण्यांच्या पिकाला या पावसाचा अधिक धोका असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
उभ्या पिकांची नासाडी
- एकीकडे सातत्याने पाऊस सुरू असल्याने पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे वणी, मारेगाव तालुक्यातील शेतशिवारात वन्यजीवांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. राेही, रानडुकरे शेतात शिरून उभ्या पिकांची नासाडी करत आहेत.