पाव एकरात घेतले १.२० लाखांच्या कांद्याचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:00 AM2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:12+5:30
देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणून चुलीतील राखड दिली. तर वेळोवेळी या पिकाला सिंचन करण्यात आले. अल्पावधीतच हे पीक उत्तम स्थिती आल्यावर कांदा पीक काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : पारंपारीक शेतीला फाटा देत तांभा येथील युवा शेतकरी श्रीकांत रामदास वाघाडे यांनी अवघ्या पाव एकरात कांद्याची लागवड करून तब्बल १.२० लाखांचे उत्पन्न घेतले आहे. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून करण्यात आलेला शेतकरी श्रीकांत यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणून चुलीतील राखड दिली. तर वेळोवेळी या पिकाला सिंचन करण्यात आले. अल्पावधीतच हे पीक उत्तम स्थिती आल्यावर कांदा पीक काढण्यात आले. अवघ्या पाव एकरात तब्बल एक लाख २० हजार रुपये मिळेल इतके कांद्याचे उत्पन्न या शेतकऱ्याला प्राप्त झाले आहे. शेतकरी श्रीकांत वाघाडे याने केलेला यशस्वी प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
अखेरपर्यंत आला २० हजार खर्च
पाव एकरात कांदा पिकाची लागवड करण्यासह पीक काढणीपर्यंत शेतकरी श्रीकांत यांना केवळ २० हजार रुपये खर्च आल्याचे तो सांगतो.
पारंपारिक व्यवसायाला दिला फाटा
युवा शेतकरी श्रीकांत यांचे वडिल मासे पकडण्याचा व्यवसाय करायचे. पण अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सोडून शेतीवर भर दिला. पारंपारिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना अनेक वेळा तोटा सहन करावा लागला. याच पाश्वभूमिवर श्रीकांत यांनी शिक्षणासोबत मासे पकडण्याच्या पारंपारिक व्यवसायाला फाटा देत शेतीत आवड दर्शविली. त्यानंतर हा नवीन प्रयोग केला.
माझा वडिलांची पांरपारीक मच्छी पकडण्याचा व्यवसाय सोडुन त्यांनी आजोबांची शेती करायला सुरवात केली. पण अर्धांगवायूच्या झटक्यानंतर वडिल घरी बसले. त्यानंतर मी शेतीत रुची दर्शवित पाव एकरात कांद्याची लागवड केली. खत म्हणून चुलीतील राख या पिकाला देण्यात आली. शिवाय सेंद्रिय पद्धतीचा वापर करून या पिकाची निगा राखली. मला खर्च वजा जाता एक लाखाचा निव्वळ नफा अपेक्षीत आहे.
- श्रीकांत वाघाडे, शेतकरी, तांभा (येंडे).