"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:31 IST2026-04-17T18:29:16+5:302026-04-17T18:31:20+5:30
Rahul Gandhi Speech on Delimitation: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक आणि मतदारसंघ फेररचना आयोगाशी संबंधित विधेयकांवर बोलताना केंद्र सरकारवर टीकेचे बाण डागले.

"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
Rahul Gandhi Speech on Delimitation in Lok Sabha: संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला मतदारसंघ फेररचनेशी जोडल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. "४५ मिनिटांमध्ये आम्ही सरकारला हरवू. कारण हे जे कृत्य आहे, ते लज्जास्पद आहे. या विधेयकांचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाहीये, हे सगळं भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे", असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी काय बोलले, दहा मुद्दे
१) लोकसभेत बोलताना राहुल गांधींची सुरुवात हलक्या फुलक्या भाषेने केली. ते म्हणाले, "आपण सगळेच आपल्या आयुष्यातील कुठल्या ना कुठल्या महिलेमुळे प्रभावित होत मोठे झालो आहोत. कुटुंब, समाज आणि देशाला पुढे नेण्यात महिलांचा वाटा निर्णायक राहिलेला आहे. पण, मला आणि पंतप्रधानांना पत्नी नाही", असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
२) "या विधेयकाचा महिलांच्या सशक्तीकरणाशी कोणताही संबंध नाही. तुम्ही पुन्हा सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. हे विधेयक देशविरोधी आहे. आम्ही सरकारला असे करू देणार नाही. दक्षिण आणि उत्तर भारतासोबत भेदभाव केला जात आहे. मागास प्रवर्ग आणि आदिवासींचा सहभाग कमी करण्याचे हे प्रयत्न आहेत."
३) "माझ्या बहिणीने ते करून दाखवले आहे, जे मला २० वर्षांमध्ये करता आलेले नाही. काल तिने गृहमंत्री अमित शाह यांना हसवले. माझ्या बहिणीची भाषणाची शैली मला आवडते. तिची शैली माझ्यापेक्षा वेगळीच आहे."
४) "हे महिला आरक्षण विधेयकच नाहीये. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झालेले आहे. हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गांच्या विरोधात आहे. त्यांचे अधिकार हिसकावून घेण्याचा हा अजेंडा आहे."
५) "देशाच्या राजकारणात काय घडतं आहे, हे बघून तुम्ही घाबरत आहात. तुमची शक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे राजकीय नकाशा बदलण्याची प्रयत्न करत आहात. हे आसाममध्ये केलं, पण आता आम्ही असे करू देणार नाही. संपूर्ण विरोधी विरोधी पक्ष हे हाणून पाडणार."
६) "आम्ही ओबीसींचे हक्क हिसकावू देणार नाही. तुम्ही त्यांना हिंदू म्हणता, पण त्यांना या देशात त्यांचे हक्क देत नाही. हे सत्य तुम्हाला सहन होत नाही. उद्योगांमध्ये, व्यवसायात, खासगी क्षेत्रात, न्याय व्यवस्थेत मागास प्रवर्ग कुठे आहे? तुम्ही ओबीसी आणि दलित यांना हिंदू म्हणता मात्र त्यांना या कुठेही स्थान देत नाही."
७) "काल पंतप्रधान मोदींचे भाषण मी बघितले. त्यांच्या बोलण्यात अजिबात शक्ती नव्हती. त्यांचे बोलणे प्रभावी नव्हते. काल १६ एप्रिल तारीख होती. तुमच्या अडचणींचे उत्तर १६ आहे. सगळे विरोधक मिळून सरकारचे हे प्रयत्न हाणून पाडणार आहोत."
८) "भारतीय महिलांच्या पाठीमागे लपून सरकार देशाचे निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. हे लज्जास्पद आहे, कारण हे सगळं भारतीय महिलांच्या नावावर केलं जात आहे."
९) "हे सरकार घाबरलेले आहे. या सरकारला अंधारात जायचे नाही, म्हणजे हे सरकार अडचणींपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर उत्तर हवे असेल तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल."
१०) "जातनिहाय जनगणनेचा आधार घेण्याचे टाळले जात आहे. ओबीसी बांधवांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न हे सरकार करत आहे. सरकारने आणलेली ही विधेयके आम्ही विरोधक मंजूर होऊ देणार नाही."