कुजबुज! दिव्यासाठी आंदोलन करणार का?; ठाणे जिल्ह्यातील कोकणच्या प्रवाशांचाही विचार करावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:12 IST2026-04-30T07:12:16+5:302026-04-30T07:12:53+5:30
कोकणात जाणाऱ्या असंख्य गाड्यांपैकी अवघ्या दोन गाड्यांना येथे थांबा आहे. अन्य गाड्या दादर, सीएसएमटी, एलटीटीपासून सुटतात.

कुजबुज! दिव्यासाठी आंदोलन करणार का?; ठाणे जिल्ह्यातील कोकणच्या प्रवाशांचाही विचार करावा
दिव्यासाठी आंदोलन करणार का ?
कोविडपूर्व काळात दादर-रत्नागिरी ही गाडी आता दिव्यातून सोडण्यात येते. ती दादरमधूनच सोडावी या मागणीसाठी उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत हे वेळ पडल्यास रेल रोकोच्या पवित्र्यात आहेत. ज्या गाड्या कोकणात जातात, पण दिव्यात थांबत नाहीत अशा गाड्यांना दिव्यात थांबा द्यावा यासाठी खा. सावंत प्रयत्न करणार का, असा सवाल प्रवाशांचा आहे. कोकणात जाणाऱ्या असंख्य गाड्यांपैकी अवघ्या दोन गाड्यांना येथे थांबा आहे. अन्य गाड्या दादर, सीएसएमटी, एलटीटीपासून सुटतात, तेव्हा ठाणे जिल्ह्यातील कोकणच्या प्रवाशांना ठाणे, पनवेलपर्यंत जावे लागते, त्याचाही विचार करावा. वेळ पडल्यास यासाठी आंदोलन करावे, अशी मागणी सामान्य प्रवासी करत आहेत.
राजधानीत हापूसवर अन्याय
खराब हवामानामुळे यावर्षी हापूसचे ८० टक्के पीक आलेच नाही. निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे हापूस उत्पादक अडचणीत आले आहेत. मुंबईमध्ये कर्नाटक व इतर दक्षिणेतील राज्यातून येणारा आंबा हापूसच्या नावाखाली विकला जात आहे. आंबा दक्षिणेचा पण खोके कोकणच्या हापूसचे, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. कमी दराचा हा आंबा हापूसच्या भावाने विकून ग्राहकांची व हापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही फसवणूक होत आहे. राज्याच्या राजधानीत मुंबईमध्येच हापूसवर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व पणन मंत्री बोगस हापूस विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देणार का, अशी चर्चा बाजार समितीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
वरिष्ठ तोडगा काढणार का?
सध्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व मिरा-भाईंदरचे आ. नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय कलगीतुरा सुरू आहे. मिरा-भाईंदरमध्ये मेहतांच्या विरोधात तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या सरनाईक यांना मेहता यांनीही आता आव्हान उभे केले आहे. भाईंदरपाडा येथील जमिनीच्या वादावरून मेहता यांनी थेट ठाण्यात येऊन सरनाईकांना आव्हान दिले. सरनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. एकूणच राज्यात जरी सत्तेत भाजप आणि शिंदेसेना एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर सरनाईक विरुद्ध मेहता वादावर वरिष्ठही तोडगा काढणार का? असा सवाल सुजाण मतदारांमधून होत आहे.
‘कार्यक्रमात अखेर नारळ मिळाला...’
कार्यक्रम कितीही गंभीर असो, त्यात थोडी मिश्किल फोडणी पडली, की रंगत काही वेगळीच येते. ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘स्वामिनी’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा रंगात आला होता. मान्यवर, टाळ्यांचा कडकडाट, उत्स्फूर्त भाषणं सगळं सुरू होतं. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करताच सभागृह दणाणून गेलं. कार्यक्रमानंतर स्वागतपर भेट म्हणून त्यांना श्रीफळ देण्यात आलं आणि छायाचित्रकारानं तो क्षण टिपलाही. तो फोटो हातात पडताच बागवे यांनी क्षणाचाही विलंब न लावता समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली ‘तरुण प्रकाशक, कवी गीतेश शिंदे याने प्रौढ अध्यक्ष अशोक बागवे यांना अखेर नारळ दिला.’