अंगारकी संकष्टी चतुर्थीचे पुढील २०४० पर्यंतचे दिवस जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:35 IST2026-05-05T18:35:16+5:302026-05-05T18:35:28+5:30
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून, मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच ‘अंगारकी संकष्टी’ अत्यंत शुभ मानली जाते.

अंगारकी संकष्टी चतुर्थीचे पुढील २०४० पर्यंतचे दिवस जाहीर
ठाणे : आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढील २०४० पर्यंतच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गणेशभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवसांची माहिती मिळाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून, मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच ‘अंगारकी संकष्टी’ अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान गणेशाची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या दिवसांची माहिती जाणून घेण्यासाठी भाविकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी पुढील अनेक वर्षांसाठी या महत्त्वाच्या दिवसांचा तपशील जाहीर केला आहे. त्यांच्या पंचांगानुसार २०२७ पासून ते २०४० पर्यंत विविध वर्षांमध्ये येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या यादीत २२ जून २०२६ पासून सुरुवात होत असून, पुढे ८ ऑगस्ट २०२८, ५ डिसेंबर २०२८, १ मे २०२९, २२ जानेवारी २०३०, १८ जून २०३०, १ ऑक्टोबर २०३०, २ डिसेंबर २०३१, ३० मार्च २०३२, १७ मे २०३३, ११ ऑक्टोबर २०३३, २८ नोव्हेंबर २०३४, २७ मार्च २०३५, १३ मे २०३६, ९ सप्टेंबर २०२६, ३ फेब्रुवारी २०३७, २७ ऑक्टोबर २०३७, २३ मार्च २०३८, १२ एप्रिल २०३९, ६ सप्टेंबर २०३९, ३ जानेवारी २०४० अशा विविध तारखांचा समावेश आहे. तसेच पुढील वर्षांमध्येही नियमित अंतराने अंगारकी संकष्टी येत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या तारखांमुळे गणेशभक्तांना उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आधीच करता येणार आहे. अनेकजण या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतरच भोजन करतात, तर काही ठिकाणी मंदिरांमध्ये विशेष पूजा, आरती आणि भजनाचे आयोजन केले जाते.
पंचांगकर्त्यांनी दिलेल्या या माहितीचा आधार घेऊन भाविकांनी आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अंगारकी संकष्टीचे हे दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जातात. त्यामुळे या तारखांची माहिती मिळाल्याने भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.