खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 15:50 IST2026-04-18T15:50:35+5:302026-04-18T15:50:52+5:30
कल्पेश आणि मीनाक्षी हे दोघे आपल्या दुचाकीवरून नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. खारेगाव टोलनाक्याजवळ आले असताना, नाशिककडूनच येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
ठाणे: नाशिक-मुंबई महामार्गावर कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती आणि पाठीमागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश रेवाळे (३०) आणि मीनाक्षी रेवाळे (३१, रा. भांडुप) अशी मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कल्पेश आणि मीनाक्षी हे दोघे आपल्या दुचाकीवरून नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. खारेगाव टोलनाक्याजवळ आले असताना, नाशिककडूनच येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कळवा पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई वाहिनीवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले असून अपघातातील वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.