मोठी बातमी; सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवर; सूर्य ओकतोय आग, जनजीवन विस्कळीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:43 IST2026-04-13T18:42:50+5:302026-04-13T18:43:02+5:30
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

मोठी बातमी; सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवर; सूर्य ओकतोय आग, जनजीवन विस्कळीत !
आप्पासाहेब पाटील/सोलापूर : सोलपूरसह राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. आज दुपारी कमाल तापमानाची नोंद ४२.५° सेल्सिअस (१०८.५° फॅरनहाइट) इतकी झाली, ज्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आजची आकडेवारी पाहता उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला आहे.
सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या दरम्यान तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर गेल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवेतील आर्द्रता कमी (२८%) असल्याने कोरड्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरचे तापमान ४१.६°C ते ४२.५°C च्या दरम्यान स्थिरावले असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि दुपारी १२ वाजेपर्यंत तापमानाचा पारा चाळीशी ओलांडतो. यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत सोलापूरच्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.