वळीव पावसाचा तडाखा; सांगली जिल्ह्यात शंभरावर घरांची पडझड, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:11 IST2026-05-14T12:10:40+5:302026-05-14T12:11:22+5:30
पिकांचे मोठे नुकसान : जत, तासगाव, पलूसला जोरदार पाऊस, गारपीट

वळीव पावसाचा तडाखा; सांगली जिल्ह्यात शंभरावर घरांची पडझड, दोघे जखमी
सांगली : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागांना झोडपले. जतमध्ये वादळी पावसाने शंभराहून अधिक घरांची पडझड झाली असून, कुणीकोणूर येथे छत कोसळून तरुणी जखमी झाली. खटाव (ता. मिरज) येथे वाऱ्याने विद्युत खांब कोसळून महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाला. जत, मिरज, तासगाव तालुक्यात वादळी पाऊस, तर पलूसला गारपीट झाली.
तासगाव तालुक्यातील आळते, चिखलगोठण, तसेच येरळा नदीकाठच्या परिसरात बुधवारी झालेला वळीव पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा, केळी व द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जत तालुक्यातील सनमडी, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शंभराहून घरांचे छत उडून गेले. पत्रे, कौले, गवती छप्पर, जनावरांचे गोठे, तसेच झाडांचे मोठे नुकसान झाले.
आबाचीवाडी येथे रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले. पलूस तालुक्यात गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला असून, यात आंबा, जांभूळ, ऊस, मका, आदी पिकांचा समावेश आहे. डफळापूर (ता. जत) येथे वादळी वाऱ्याने श्रीपती शुगर कारखान्याचे पत्रे उडाले आणि ते नजीकच्या द्राक्ष बागेवर पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले.