अवकाळी वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अडीच कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:38 IST2026-05-12T15:37:27+5:302026-05-12T15:38:24+5:30

Unseasonal Rains Ratnagiri: सर्वाधिक फटका मंडणगड तालुक्याला

Unseasonal rains cause loss of Rs 2 crore in Ratnagiri district | अवकाळी वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अडीच कोटींचे नुकसान

संग्रहीत छाया

Unseasonal Rains Ratnagiri: मे महिन्यात पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने जिल्ह्यात २ कोटी ४६ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पावसाने मंडणगड तालुक्यात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान केले आहे. यापैकी बरेचसे नुकसान शनिवारी दुपारनंतर आलेल्या धुळीच्या वादळाने केलेल्या पडझडीमुळे झाले आहे.

जिल्ह्यात तापमानात आणि आर्द्रतेत अधिक वाढ होऊ लागली आहे. उन्हाने जीव कासावीस होत असतानाच घामाच्या धारा असह्य करत आहेत. त्यात अधूनमधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, पावसाच्या हलक्या सरीमुळे उकाड्यात अधिकच वाढ होत आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून उकाड्यात कमालीची वाढ होत असतानाच हवामान खात्याने जिल्ह्यात दि. ७ मेपासून पावसाच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला होता. दि. ७ आणि ८ रोजी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला.

मात्र, शनिवार, दि. ९ मे रोजी दुपारनंतर अचानक धुळींचे वादळ जिल्हाभरात सुरू झाले. या वादळाने बहुतांश भागात पडझडीमुळे अतोनात नुकसान केले. धुळीच्या वावटळीबरोबरच वाऱ्याच्या झंझावाताने अनेक मोठमोठी झाडे रस्त्यावर कोलमडून पडली. काही घरांवर झाडे कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले.

घरांची काैले, पत्रे उडाले. धुळीचे वादळाने कमी वेळेत प्रचंड नुकसान केले. या वादळामुळे विद्युत पोलवर झाडे कोसळल्याने पुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडले. रोहित्र निकामी झाले. अचानक आलेल्या या धुळीच्या वादळाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच धुळीचे वादळ आल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे.
मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात किरकोळ नुकसान केले.

सर्वाधिक नुकसान महावितरणचे १ कोटी १५ लाख रुपयांचे झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.

दि. १ ते ११ मे या कालावधीतील वादळी पावसामुळे जिल्ह्यात झालेले एकूण नुकसान : २ कोटी ४६ लाख ८५ हजार

जखमी व्यक्ती : २
कच्ची घरे (५९) : २.३६ लाख
अंशत: पक्की घरे (९००) : ६१.१० लाख
दगावलेली जनावरे (४) : १.५१ लाख
दुकान (४) : २ लाख
शाळा (८) : ३.२१ लाख
अंगणवाडी (७) : ७१ हजार
इमारती (७) : ५९ हजार
पाणीपुरवठा योजना (१) : २५ हजार
महावितरण : १.१५ कोटी
उच्च दाब पोल (१६४)
लघुदाब पोल (३२१)
रोहित्रे (९)

Web Title : बेमौसम तूफान से रत्नागिरी जिले में ₹2.5 करोड़ का नुकसान

Web Summary : रत्नागिरी में बेमौसम तूफान से ₹2.5 करोड़ का नुकसान हुआ, मंडणगढ़ सबसे ज्यादा प्रभावित। धूल भरी आंधी से घरों को नुकसान, बिजली बाधित। बिजली कंपनी को नुकसान, पर आपूर्ति बहाल।

Web Title : Ratnagiri District Suffers ₹2.5 Crore Loss Due to Unseasonal Storm

Web Summary : Unseasonal storms caused ₹2.5 crore loss in Ratnagiri, with Mandangad hit hardest. Dust storms damaged homes and disrupted power. Power company suffered losses, but quickly restored supply.