रत्नागिरी येथील मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:09 PM2021-05-11T19:09:44+5:302021-05-11T19:11:31+5:30
Corona vaccine Ratnagiri : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घोळ सुरूच होता.
रत्नागिरी : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पोलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घोळ सुरूच होता.
सध्या ऑनलाईन व अन्य मार्गाने लसी मिळत नसल्याने लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत़ मंगळवारी मिस्त्री हायस्कूल केंद्रावर सकाळी १८ ते ४४ वर्षांकरिता ऑनलाईन पध्दतीने बुकिंग करून लस देण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती लोक त्याठिकाणी उपस्थित होती.
याच केंद्रावर दुपारनंतर ४५ वर्षांवरील लोकांसाठी दुसऱ्या लसीचा कार्यक्रम होता. परंतु अनेक केंद्रावर लसींचा साठा अपुरा येत असल्यामुळे ४५वरील अनेकांच्या दुसऱ्या लसीची मुदत संपत आल्याने लस मिळण्यासाठी नागरिकांनी सकाळी ५ वाजल्यापासून रांग लावली होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडाला. याठिकाणी वादावादीचे प्रसंग सुरू झाले.
दरम्यान यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले़ पोलिसांनी हस्तक्षेप करून दुपारनंतर असणाऱ्या लसीकरणसाठी आलेल्या लोकांना तेथून बाजूला केले. त्यामुळे लोकांमध्ये आणखी संतापाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून रांगा लावूनही लस मिळणार नसेल तर काय करायचे असा प्रश्न विचारला गेला तर लसीकरणासाठी थेट आलेल्या लोकांनी गर्दी पाहून काहीनी तेथूनच माघारी परतण्याचा निर्णय घेतला. तर सायंकाळी लसीचा कार्यक्रम सुरू होताच केवळ एका तासातच लसीकरण बंद केल्याने नागरिक आणखीनच संतप्त झाले. त्यामुळे वातावरण तापले होते.