चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; हातात कापलेले मुंडके घेऊन जाणाऱ्या पतीला ११ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:40 IST2026-05-07T10:40:39+5:302026-05-07T10:40:50+5:30
आरोपीने न्यायालयात असा बचाव केला होता की, हा गुन्हा दुसऱ्या कोणीतरी केला असून, आपण केवळ भीतीपोटी मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात जात होतो

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; हातात कापलेले मुंडके घेऊन जाणाऱ्या पतीला ११ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे मुंडके, हात आणि पाय कुऱ्हाडीने तोडून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जोशी यांनी हा आदेश दिला.
रामचंद्र शेहू चव्हाण (वय ७४, रा. गंगा ओशियन पार्क सोसायटीसमोर, भारती विद्यापीठ परिसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई रामचंद्र चव्हाण (वय ५५) यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या प्रकरणात एकूण २४ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीची सून सुनीता चव्हाण ही मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने डोळ्यांदेखत आपल्या सासूवर झालेला हल्ला पाहिला होता. मयताचे रक्त तिच्या कपड्यांवरही उडाले होते. यात तिची साक्ष महत्त्वाची ठरली. याशिवाय, शेजारच्या इमारतीमधील एका रहिवाशाने आपल्या बाल्कनीतून ही घटना पाहिली होती. तसेच रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने आरोपी कापलेले मुंडके घेऊन जात असतानाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे, हा साक्षीदार नोकरीनिमित्त जपानमध्ये असतानाही न्यायालयाने जपानमधून त्याची साक्ष नोंदवून घेतली. एका ५ वर्षांच्या चिमुरडीनेही 'अण्णा' (आरोपी) ला ओळखले.
आरोपीने न्यायालयात असा बचाव केला होता की, हा गुन्हा दुसऱ्या कोणीतरी केला असून, आपण केवळ भीतीपोटी मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात जात होतो. फिर्यादीने (सूनबाईने) आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिली. आरोपीचा बचाव न्यायालयाने अमान्य केला. मात्र, सरकारी वकिलांनी तांत्रिक पुरावे रक्ताचे नमुने, फॉरेन्सिक अहवाल आणि आरोपीने रस्त्यात एका महिलेला दिलेल्या कबुलीचा आधार घेत गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने आरोपीचा बचाव फेटाळून लावत त्याला दोषी ठरविले.
काय आहे प्रकरण?
ही घटना ९ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत घडली होती. आरोपी रामचंद्र चव्हाण हा सुरक्षारक्षक (वॉचमन) म्हणून काम करायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात सतत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी आरोपीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याने केवळ तिची हत्याच केली नाही, तर तिचे मुंडके, दोन्ही हात आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे केले. यानंतर आरोपी पत्नीचे कापलेले मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन रस्त्यावरून चालत निघाला होता, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
'बायकोला मारले' आरोपीने दिलेला कबुलीजबाब न्यायालयात सिद्ध
घटनेनंतर आरोपी एका हातात मुंडके (त्यातून रक्त गळत असलेले) व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने आरोपीला विचारले की 'अण्णा कुठे बकरू कापले?' त्यावेळी आरोपी म्हणाला, 'बायकोला मारले'. आरोपीने महिलेला दिलेला कबुलीजबाब सरकारी पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.