Pune Water Cut: पुण्यातील 'या' भागात ८ ते १० दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:56 IST2026-01-30T09:56:11+5:302026-01-30T09:56:25+5:30
Water Cut in Pune: पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे

Pune Water Cut: पुण्यातील 'या' भागात ८ ते १० दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
पुणे : पवना बंधाऱ्यातून पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. ही गळती दुरुस्त करण्यासठी चिखली येथील जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर या भागांस आठ ते दहा दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पुणे महापालिकेने चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलकेंद्राला पवना बंधाऱ्यातून ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करतात. मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. महापालिकेने ही गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, या ठिकाण दलदलीचे असून जलवाहिनीवर विद्युत केबल्स, इंटरनेट केबल्स, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन इत्यादी सेवा वाहिनीचे जाळे असल्याने गळती बंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी त्याठिकाणी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यास अंदाजे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही लाईन बंद करण्यात आली आहे.
या लाईनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या कळस माळवाडी, जाधववस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, वर्माशेल, विमानतळ व सभोवतालच्या परिसराला पर्यायी पाण्याच्या लाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस या भागाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
बालभारतीजवळ जलवाहिनी फुटलेली नाही
सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती जवळ जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते नंदकिशोर जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फर्ग्युसन टेकडी येथे नवीन पाण्याची टाकी उभी केली आहे. या पाण्याच्या टाकीला एसएनडीटी जलकेंद्रातून चतु:श्रुंगीला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी बालभारती येथे जलवाहिनी जोडली जाणार आहे. या कामासाठी वेल्डिंग काम करावे लागणार आहे, त्यामुळे मुख्य जलवाहिनी मोकळी करण्यात आली आहे.