टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 05:59 IST2026-05-17T05:59:48+5:302026-05-17T05:59:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या ‘नीट’च्या पेपरफुटीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे; पण शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ...

टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या ‘नीट’च्या पेपरफुटीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे; पण शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) घोटाळ्याला पाच वर्षे उलटली तरी तपासात प्रगती झालेली नाही. दोषारोपपत्र दाखल झाले; पण अद्यापही आरोप निश्चिती झालेली नाही. सर्व मुख्य आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून, पोलिसांनी जप्त केलेले सोने आणि इतर मौल्यवान वस्तूही त्यांना परत केल्या आहेत. आजमितीला हे प्रकरण केवळ ‘तारीख पे तारीख’ मध्येच अडकले आहे. शुक्रवारी देखील सुनावणी पुढे ढकलण्यात आली, आता ३ जुलैची तारीख आहे.
पुणे सायबर पोलिसांनी २०२१ मध्ये या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके आणि त्यांच्या पथकाने आरोग्य विभाग ते म्हाडापर्यंतच्या घोटाळ्यांचे धागेदोरे शोधले होते. मात्र, यथावकाश त्यांच्या बदल्या झाल्या.
काय होते प्रकरण?
‘टीईटी’मध्ये अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढविणे, गुणपत्रक बदलून त्यांना पास करण्यासाठी पैसे घेण्यात आले होते. १५ जुलै २०१८ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०१८ मध्ये लागला.
जी.ए. सॉफ्टवेअर या परीक्षा आयोजनाचे कंत्राट असलेल्या कंपनीचे मॅनेजर अश्विनी कुमार याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम सुपे व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने अपात्र १,७०१ परीक्षार्थींकडून ५ कोटी ३७ लाख रुपये गोळा केले होते.
जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक गणेशन कलियन याला २ कोटी, सुखदेव ढेरे याला २० लाख, तुकाराम सुपे याला ३० लाख रुपये मिळाले होते. यात तब्बल ७,८०० नापास उमेदवारांना ‘पात्र’ करून शिक्षक बनविण्यात आले.
आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी आरोपनिश्चिती झालेली नाही. सध्या सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. पाच वर्षे झाली तरीही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झालेली नाही. केवळ तारखाच मिळत आहेत.
मिलिंद पवार,
आरोपींचे वकील