हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 05:51 IST2026-05-17T05:50:44+5:302026-05-17T05:51:02+5:30
शतकाच्या सुरुवातीला भारतातील प्रदूषित गंगा नदीत ऑक्सिजनची कमतरता जागतिक सरासरीपेक्षा २० पट अधिक वेगाने वाढत होती.

हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीमुळे भारतासह सर्वच देशांच्या नद्यांतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मासे आणि नद्यांमध्ये राहणाऱ्या इतर जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असा इशारा एका नव्या अभ्यासात देण्यात आला आहे. चीनमधील संशोधकांनी उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने १९८५पासून जगभरातील २१०००हून अधिक नद्यांमधील ऑक्सिजन पातळीचा अभ्यास केला. त्यातील हा निष्कर्ष आहे.
या शतकाच्या सुरुवातीला भारतातील प्रदूषित गंगा नदीत ऑक्सिजनची कमतरता जागतिक सरासरीपेक्षा २० पट अधिक वेगाने वाढत होती. जर जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात मध्यम किंवा उच्च स्तरावरील वाढ कायम राहिली, तर या शतकाच्या अखेरीस पूर्व अमेरिका, आर्क्टिक, भारत आणि दक्षिण अमेरिकेतील मोठ्या भागांतील नद्या जवळपास १० टक्के ऑक्सिजन गमावू शकतात.
ऑक्सिजनमध्ये २.१% घट
यासंदर्भात ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखानुसार १९८५पासून आतापर्यंत नद्यांमधील ऑक्सिजनची पातळी सरासरी २.१ टक्क्यांनी घटली आहे. पहिल्या दृष्टिक्षेपात ही घट फार मोठी वाटत नसली, तरी शास्त्रज्ञांच्या मते ही घट सतत वाढत राहाणार आहे.
जर हीच गती कायम राहिली किंवा आणखी वाढली, तर या शतकाच्या अखेरीस पूर्व अमेरिकेतील, भारतातील आणि उष्णकटिबंधीय भागांतील अनेक नद्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी होईल की मासे गुदमरू लागतील व नद्या ‘ऑक्सिजनविरहित’ वाहतील.
गरम पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण होतेय कमी
नानजिंग स्थित ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे पर्यावरण शास्त्रज्ञ ची गुआन म्हणतात, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रातील मुलभूत तत्वांनुसार गरम पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते.
हवामान बदलामुळे पाणी अधिक गरम होत आहे आणि त्यामुळे अधिक ऑक्सिजन वातावरणात निघून जात आहे. जर ऑक्सिजन घटण्याचा सध्याचा वेग कायम राहिला, तर या शतकाच्या अखेरीस जगातील नद्या अजून चार टक्के ऑक्सिजन गमावतील.