Akshaya Tritiya: यंदा उत्पादन ३० ते ५० टक्क्यांनी घटल्याने अक्षय्य तृतीयेला 'फळांचा राजा' महाग; हापूस ८०० ते १५०० रुपये डझन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:02 IST2026-04-16T18:01:27+5:302026-04-16T18:02:05+5:30
उत्पादन कमी झाले असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी आवक कमी झाल्याने आंब्याचे भाव वाढले असल्याचे व्यापा-यांनी सांगितले

Akshaya Tritiya: यंदा उत्पादन ३० ते ५० टक्क्यांनी घटल्याने अक्षय्य तृतीयेला 'फळांचा राजा' महाग; हापूस ८०० ते १५०० रुपये डझन
पुणे: अक्षय्य तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. प्रथमच आतापर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंबा महाग झाला आहे. सध्या ८०० ते १५०० रुपये डझन या दराने हापूस आंब्यांची विक्री होत आहे. अक्षय्य तृतीयेमुळे घाऊक बाजारात कच्च्या आंब्याची आवक होत आहे. मात्र तयार आंब्याचे प्रमाण कमी असल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्यांनी भाव खाल्ला आहे.
मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक फळ बाजारात दर वर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्यामुळे दर कमी होतात. मात्र, यंदा कोकणातील हापूस आंब्यांवर वातावरणातील बदलांचा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी आवक कमी झाल्याने आंब्याचे भाव वाढले असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
घाऊक बाजारात सध्या पाच ते सात डझन (कच्च्या) आंब्यांचे दर तीन हजार ते सहा हजार आहेत, तर तयार आंबा पाच ते सात डझन आंब्यांची पेटी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपये या दराने विक्री होत आहे.
आवक घटली अन् अक्षय्य तृतीयेवर परिणाम
दर वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांची आवक घटली आहे. घाऊक बाजारात सध्या दिवसाला सात ते आठ हजार पेट्यांची आवक होत आहे. दर वर्षीच्या तुलनेत ही आवक ३० ते ३५ हजार पेट्यांपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र सध्या ती आवक केवळ ७ ते ८ हजार पेट्यांवर आली आहे. मागणी देखील वाढली आहे. मात्र मालच उपलब्ध नसल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचा परिणाम झाला आहे.
हवामानातील बदलांमुळे यंदा प्रथमच हापूस आंब्यांची आवक घटली आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला आंबा महाग झाला आहे. पुर्वी दरवर्षी ३०-३५ हजार पेट्यांची आवक होत असे. मात्र यंदा केवळ ७ ते ८ हजार पेट्या आल्या आहेत. यामुळे अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर आली असली तरी बाजारात आंब्याचा तुटवडा आहे. पुढील आठवड्यात दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या ८०० ते १५०० रुपये डझनचा दर आहे. - युवराज काची आंब्याचे व्यापारी