"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:46 IST2026-04-16T19:44:12+5:302026-04-16T19:46:04+5:30
Priyanka Gandhi on Women Reservation : मतदारसंघातील जागा ८५० पर्यंत वाढवणे आणि त्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेणे, यात स्पष्टपणे राजकारणाचा वास येत आहे. सरकार जुन्या आकडेवारीवर हे का करत आहे? जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही,"

"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) यासंदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी मांडण्यात आलेल्या विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी जोरदार भाषण केले. त्या म्हणाल्या, आजची ही चर्चा महिला आरक्षणावर नाही तर 'राजकीय खेळी'वर आहे. यावेळी त्यांनी चाणक्यांचाही उल्लेख केला.
विधेयकाच्या मसुद्याचा उल्लेख करत प्रियंका म्हणाल्या, "मी संपूर्ण मसुदा वाचला आहे. यात सर्वात आधी लिहिले आहे, महिला आरक्षण २०२९ पर्यंत लागू केले जाईल आणि याला आमचे समर्थन आहे. मात्र, मतदारसंघातील जागा ८५० पर्यंत वाढवणे आणि त्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेणे, यात स्पष्टपणे राजकारणाचा वास येत आहे. सरकार जुन्या आकडेवारीवर हे का करत आहे? जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही,"
प्रियांका पुढे म्हणाल्या, २०२३ च्या मूळ विधेयकात नवीन जनगणनेची तरतूद होती, जी आता गायब आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य करताना त्या म्हणाल्या, "आज चाणक्य असते, तर तेही थक्क झाले असते."
"सध्याच्या स्वरूपातील विधेयकाला काँग्रेसचे समर्थन नाही" -
विधेयकाच्या 'टायमिंग'वर सवाल उपस्थित करत प्रियांका म्हणाल्या, "नवीन जनगणनेत मागासवर्गीयांचे खरे आकडे समोर येतील आणि त्या प्रमाणात आरक्षण द्यावे लागेल, या भीतीने पंतप्रधान घाबरले आहेत. यामुळेच सरकार घाईघाईने सुधारणा विधेयक आणून ओबीसी (OBC) वर्गाचा हक्क मारत आहे. दरम्यान, वारंवार दिशाभूल करणाऱ्या पुरुषांना महिला लगेच ओळखतात, यामुळे सरकारने सावध राहावे. २०२३ मध्ये काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र सध्याच्या स्वरूपातील विधेयकाला काँग्रेसचे समर्थन नाही, असे प्रियंका गांधी वाड्रा यांनी जाहीर केले.