"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:20 IST2026-04-16T20:20:27+5:302026-04-16T20:20:50+5:30
Priyanka Gandhi on Women Reservation : जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही," असे म्हणत, प्रियंका गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.

"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यासंदर्भातील विधेयकावरील चर्चेदरम्यान आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. "सरकार हे विधेयक अत्यंत घाईने मंजूर करण्याचा प्रयत्न करत आहे. २०११ च्या जुन्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) करणे योग्य नाही. यात स्पष्टपणे राजकारण दिसत आहे. सरकार जुन्या आकडेवारीवर हे का करत आहे? जोवर जातीनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत सर्व घटकांना योग्य वाटा मिळू शकत नाही," असे म्हणत, प्रियंका गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण..." -
प्रियंका गांधी म्हणाल्या, संसदेचा ५० टक्क्यांनी विस्तार करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत नाही. संपूर्ण विधेयकात या मुद्द्यावर स्पष्टतेचा अभाव आहे. एवढेच नाही तर, राहुल गांधींचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, संसदेत त्यांची (राहुल गांधी) अनेकदा खिल्ली उडवली जाते, पण जेव्हा गंभीर विषयांवर विचार केला जातो, तेव्हा त्यांच्याच मुद्द्यांची दखल घेतली जाते," असेही प्रियंका म्हणाल्या.
"सत्ता टिकवून ठेवण्याचा हथकंडा" -
प्रियंका म्हणाल्या, एकीकडे ओबीसी वर्गाच्या हिताच्या गोष्टी केल्या जातात, पण दुसरीकडे त्यांचे अधिकार कमकुवत केले जात आहेत. "लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा असताना, तिथेच ३३ टक्के महिला आरक्षण का लागू केले जात नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने या महत्त्वपूर्ण मुद्द्याला केवळ "सत्ता टिकवून ठेवण्याचा हथकंडा" बनवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.