धरण शेजारी, तरी घशाला कोरड..! कोपरे-मांडवे गावात भीषण पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:05 IST2026-05-09T18:04:17+5:302026-05-09T18:05:31+5:30
pune water shortage - ५० हजार लिटर गरज, मिळते फक्त २० हजार; टँकरवर गावाचा जीव, जलजीवन मिशन रखडले

धरण शेजारी, तरी घशाला कोरड..! कोपरे-मांडवे गावात भीषण पाणीटंचाई
ओतूर : जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. गावाच्या शेजारी चिल्हेवाडी धरण असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असल्याने “धरण उशाला अन् कोरड घशाला” अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सुमारे सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाची ओळखच ‘पाणीटंचाईग्रस्त’ अशी बनली असून, येथील परिस्थिती पाहता विवाह जुळवितानाही अडचणी निर्माण होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सध्या गावात दोन सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गावाची दररोज सुमारे ५० हजार लिटर पाण्याची गरज असताना, केवळ २० हजार लिटर पाणी मिळत असल्याने नागरिकांची तहान भागत नाही. परिणामी अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरी, बोअरवेल, नदी व खडकातील टाक्यांमधील पाणी पूर्णतः आटले आहे. काही ठिकाणी उपलब्ध असलेले पाणीही पिण्यायोग्य नसल्याने महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड उडत असून, दोन हंडे पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे. सुमारे ५० टक्के पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असले तरी प्रस्तावित बंधाऱ्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. “पाण्याचा साठाच नसेल, तर पाइपलाइनमधून पाणी येणार कुठून?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सरपंच रोहिणी माळी यांनी मंत्रालयात चौकशी केली असता, जिल्हा परिषद पुणे येथील पाणीपुरवठा विभागाने या कामाची डीएलसी अद्याप पाठवलेली नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेल्या ४० वर्षांपासून या भागात एमआय टँकसाठी संघर्ष सुरू आहे. विविध राजकीय पक्षांकडून आश्वासने मिळाली, मात्र प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. मांडवी खोरे पाणी संघर्ष समितीच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला जात असून, लवकरच पुण्यातील कृष्णा खोरे महामंडळ कार्यालयात बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोपरे-मांडवे येथील बहुतांश नागरिक रोजंदारीसाठी बाहेरगावी जातात. मात्र, पाणीटंचाईमुळे घरातील एक व्यक्ती टँकरच्या रांगेत थांबावी लागत असल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. “दोन हंडे पाण्यासाठी दिवसाचा मोठा वेळ खर्च होतो,” अशी व्यथा नागरिकांनी मांडली.
प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिरिक्त टँकर सुरू करावेत, तसेच जलजीवन मिशन व एमआय टँकची कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी सचिन देठे, मिलिंद देठे, मच्छिंद्र तळपे, राहुल सोनवणे, सोनू कुडळ, अंकुश माळी, काशिनाथ माळवे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
गावाशेजारी धरण असूनही आम्हाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. टँकरचे पाणी अपुरे पडत असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. - पुणाजी मुठे, स्थानिक नागरिक
लोकसंख्या मोठी असताना पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आहे. अतिरिक्त टँकर सुरू करून जलजीवन मिशनचे काम लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. - रोहिणी माळी, सरपंच
जनावरांनाही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. - काशिनाथ माळवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते