लोणावळ्यात बोअरवेलच्या गाडीने दुचाकी उडवली; आदिवासी तरुणाचा मृत्यू; संतप्त जमावाने तब्बल ५ तास महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:09 IST2026-05-01T10:58:32+5:302026-05-01T11:09:54+5:30
- दुचाकी लोणावळ्याकडे जात असताना मागून येणाऱ्या बोअरवेलच्या भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली

लोणावळ्यात बोअरवेलच्या गाडीने दुचाकी उडवली; आदिवासी तरुणाचा मृत्यू; संतप्त जमावाने तब्बल ५ तास महामार्ग रोखला
पुणे - लोणावळा शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला. बोअरवेलच्या गाडीने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने १७ वर्षीय आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक आदिवासी बांधवांनी महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडले. परिणामी जवळपास पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
मृत तरुणाची ओळख मनिष पिंट्या वाघमारे (वय १७, रा. कुने नामा ठाकरवाडी) अशी झाली आहे. या अपघातात अक्षय कोळी हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी लोणावळ्याकडे जात असताना मागून येणाऱ्या बोअरवेलच्या भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मनिष वाघमारे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी परिसरात पसरताच मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला परिस्थिती तणावपूर्ण होती; मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान, संबंधित बोअरवेल वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.