अपूर्ण कामांमुळे पालखी महामार्गाची वाटचाल खडतर; वारकऱ्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:02 IST2026-05-15T15:02:18+5:302026-05-15T15:02:37+5:30
- इंदापूर बायपास येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे.

अपूर्ण कामांमुळे पालखी महामार्गाची वाटचाल खडतर; वारकऱ्यांमध्ये नाराजी
बावडा : श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे इंदापूर बायपास ते सराटी दरम्यानचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने लगतच्या गावांतील ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पालखी सोहळ्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पूर्ण न झाल्याने यंदाच्या आषाढी वारीतही वारकऱ्यांना खडतर प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
यंदा जुलै महिन्यात श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार असताना महामार्गावरील अपूर्ण कामे आणि विस्कळीत व्यवस्था चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्यावर्षीही पालखी सोहळा प्रमुखांनी या महामार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पालखी मुक्कामाच्या गावांमधील सर्व्हिस रोड, गटर लाईन आणि इतर सुविधांची अवस्था पाहता ‘हा मार्ग खरोखर पालखी सोहळ्यासाठीच तयार करण्यात आला आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
इंदापूर बायपास येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. वडापुरी (ता. इंदापूर) येथील उड्डाणपुलाचे कामही संथ गतीने सुरू असून, त्या परिसरातील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याची तक्रार आहे. सर्व्हिस रोडच्या दुतर्फा गटर लाईनचे काम रखडलेले असल्याने पावसाळ्यात वारकरी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वकीलवस्ती येथील रस्त्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. बावडा येथील पालखी महामार्ग बायपासचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच बावडा जीवननगर परिसरातील क्रॉस रोडवर पथदिवे आणि दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे महामार्गाचे काम पूर्ण नसतानाही टोल वसुली सुरू असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
टोल नाक्याजवळ सराटीच्या बाजूने महामार्गाचे कामही अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातून होत आहे.