वाढत्या उष्णतेमुळे सिंचन-पाणीटंचाई प्रश्न गंभीर; युगेंद्र पवारांची तहसीलदारांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:24 IST2026-05-14T17:24:01+5:302026-05-14T17:24:27+5:30
- युगेंद्र पवार यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे यांची भेट घेत तालुक्यातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा

वाढत्या उष्णतेमुळे सिंचन-पाणीटंचाई प्रश्न गंभीर; युगेंद्र पवारांची तहसीलदारांकडे धाव
बारामती : वाढत्या तीव्र उन्हामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या सिंचन, पाणीटंचाई आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे.
युगेंद्र पवार यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे यांची भेट घेत तालुक्यातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. सध्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढविणे, विहिरी आणि जलस्रोतांची स्वच्छता करणे तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावोगावी दौरे करून नागरिकांशी संवाद साधत असल्याचे पवार यांनी नमूद केले. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, सिंचनासाठी पाणी तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक अडचणी नागरिकांनी मांडल्या असून, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण तहसीलदारांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीपिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.