अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याला अडथळा; खटकेवस्ती ग्रामस्थांची चारी काढण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:56 IST2026-05-15T14:56:18+5:302026-05-15T14:56:53+5:30
- रस्त्याच्या बाजूपट्टीवर मुरूम टाकून व शेततळे बांधून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याला अडथळा; खटकेवस्ती ग्रामस्थांची चारी काढण्याची मागणी
इंदापूर : शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे पावसाचे व पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग उरला नसल्याने पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या दुतर्फा चारी काढण्यात याव्यात, अशी मागणी कळस गाव परिसरातील बागवाडी खटकेवस्ती येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि देसाई इन्फ्रा कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, कळस गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खटकेवस्ती भागातून डाळज-कळस-जंक्शन-वालचंदनगर-दहीवडी-नातेपुते-कराड या रस्ता सुधारणा प्रकल्पाचे काम करण्यात आले. हे काम देसाई इन्फ्रा कंपनीने नुकतेच पूर्ण केले आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या दत्तात्रय विष्णू ओमासे आणि कांताबाई सखाराम खटके यांच्या शेतांलगतच्या भागात चारी काढण्यात आलेल्या नाहीत. तसेच रस्त्याच्या बाजूपट्टीवर मुरूम टाकून व शेततळे बांधून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करण्यात आला आहे.
पूर्वीपासून असलेल्या ओढ्यावर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने उभारलेला पूलही मुरूम टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यानंतर पाणी थेट घरांमध्ये शिरत असून आर्थिक नुकसानीबरोबरच जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धनाजी आण्णा खटके, ज्ञानदेव संपत खटके, महादेव पिराजी खटके, विठ्ठल पांडुरंग खटके, आण्णा शंकर खटके, वामन मारुती खटके, अंबादास आण्णा खटके आणि संभाजी पिराजी खटके यांच्या सह्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
धनाजी खटके म्हणाले, “अतिक्रमणांमुळे पावसाचे व पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग राहिलेला नाही. मागील पावसाळ्यात संपूर्ण खटकेवस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्याचे पंचनामेही झाले आहेत. रस्त्याच्या उत्तरेकडील घरे पूर्णपणे रस्त्यालगत असून, अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पूल बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कालव्यातून ५० ते ६० ट्रॉली मुरूम आणण्यात आल्याची चौकशी व्हावी.”