Pune Nasrapur Case: शेतातील महिलांवर वाईट नजर; गैरकृत्य करण्याचा प्रयत्न, नराधम अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:21 IST2026-05-04T17:21:04+5:302026-05-04T17:21:34+5:30
Pune Nasrapur Case आरोपी कांबळेच्या विकृत वागण्याला कंटाळून ग्रामस्थांनी त्याला २० वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले होते, त्याची पत्नी आणि मुलगाही राहत नसल्याचे समजते आहे

Pune Nasrapur Case: शेतातील महिलांवर वाईट नजर; गैरकृत्य करण्याचा प्रयत्न, नराधम अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा
पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी केली जाणार असून, आरोपी पीडित मयत मुलीला यापूर्वी कितीवेळा भेटला आहे, इतर कोणत्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे का किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(खून), ६४(बलात्कार), ७४(विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), १३७(२), १४०(१), १४०(३) (अपहरण) यासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चिमुकलीच्या आईने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. ही घटना शुक्रवारी (दि १ ) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसरापूर गावाजवळ घडली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे, त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपी चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, आरोपीने चिमुकलीला कोणत्या हत्याराने मारले, त्याचा तपास करून पुरावा गोळा करायचा आहे. आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का, याची चौकशी करायची आहे, असे तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विकृत प्रवृत्तीमुळे २० वर्षांपूर्वीच गावाने काढले होते बाहेर
आरोपी भीमराव कांबळे हा सुरुवातीपासूनच अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचा होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्या याच विकृत वागण्याला कंटाळून ग्रामस्थांनी त्याला तब्बल २० वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले होते अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि मुलगाही राहत नसल्याचे समजते. शेतात जाणाऱ्या अनेक महिलांवर त्याची नेहमीच वाईट नजर असायची आणि त्याने अनेकदा त्यांच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता असेही सांगितले जात आहे.