पाण्याचा अंदाज चुकला अन्… ; पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शिरवता धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 18:00 IST2026-05-17T17:59:58+5:302026-05-17T18:00:23+5:30
पुण्यात शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी पर्यटनासाठी शिरवता धरण परिसरात आले होते.

पाण्याचा अंदाज चुकला अन्… ; पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शिरवता धरणात बुडून मृत्यू
पवनानगर : मावळ तालुक्यातील शिरवता धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी पर्यटनासाठी शिरवता धरण परिसरात आले होते. धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत आर्या सुशांत बांदावर (वय २०, रा. गोंदिया) आणि करण ज्ञानदेव ठोंबरे (वय १९, रा. सातारा) यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दोन्ही युवकांना पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिकेतून कामशेत येथील रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रकरणाची नोंद कामशेत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरातील पाण्याची पातळी आणि खोली वाढलेली असल्याने पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.