पिंपरी : आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बुधवारी (दि. १५) पालकांना बसला आहे. आकुर्डीतील उन्नत शहर साधन केंद्रात अधिकारी कर्मचाऱ्यांअभावी गोंधळ उडाला. भर उन्हात शेकडो पालक उभे होते, त्यामुळे संताप अनावर झाला. गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.
आरटीईची सोडत काढल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीस सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात केंद्रावर आज अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. भर उन्हात पालक ताटकळत उभे होते. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.
आकुर्डी केंद्रावर सुरक्षारक्षकांकडून नावनोंदणी सुरू होती. कागदपत्र तपासणीसाठी जबाबदार अधिकारी नसल्याने पालकांचे प्रश्न आणि शंकांचे समाधान होऊ शकले नाही. आम्हाला टोकन द्या, कागदपत्र तपासा, आम्ही हेलपाटेच मारायचे का? अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये बाचाबाचीही झाली.
पालकांच्या रोषापुढे शिक्षणाधिकारी हतबल
दुपारी सुमारे एक वाजता महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि लिपिक प्रिन्स सिंग यांनी केंद्रात येऊन कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात केली. गोंगाट आणि प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. शिक्षणाधिकारी बांगर यांनी अत्यल्प मनुष्यबळात परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करीत पालकांना टोकन वाटप सुरू केले. मात्र, गर्दीमुळे चेंगराचेंगरीही झाली. महिला पालकांचे हाल झाले. काहींना रडू कोसळले. दुपारी तीननंतर केंद्रातील पथक आल्यानंतर पालकांना टोकन देण्यासह कागदपत्र जमा केल्याने गर्दी कमी झाली. केंद्राबाहेर पालकांसह सोबत असलेल्या चिमुकल्यांचे पाण्यावाचून हाल झाले. तर केंद्रात कागदपत्र जमा करण्यासाठी स्टॅपर न मिळाल्याने पालकांची धावपळ उडाली होती.
पिंपरी केंद्रातही गैरसोय
आकुर्डीप्रमाणेच पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील केंद्रावरही अधिकारी अनुपस्थित असल्याने पालकांना दुपारी तीननंतर बोलावण्यात आले. हेलपाट्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी तीन नंतर टोकन वितरण व कागदपत्र स्वीकारण्यात आली.
शासनाच्या पटपडताळणीचे मंगळवारी नियोजन केले. त्यानुसार बुधवारी आकुर्डी केंद्राचे पथक पटपडताळणीसाठी गेले आणि पालकांची गर्दी वाढली. केंद्रात गोंधळ उडाल्याचे समजताच स्वतः धाव घेत सुरक्षा रक्षकांसह काही पालकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी तीनला पथक आल्यानंतर एकूण ७५६ पालकांची कागदपत्र जमा केली. सायंकाळी सातपर्यंत २०० कागदपत्रांची पडताळणी केली. - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका
आरटीई पडताळणीसाठी केवळ दहा दिवसांची मुदत आहे. त्यात सलग सुट्याही आल्याने प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. कागदपत्र जमा केल्याची पोहोचही दिली जात नसल्याची तक्रार आहे. शासनाने पडताळणी प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी. - मुकुंद कीर्दत, आप पालक युनियन
Web Summary : RTE admission verification caused chaos in Akurdi due to staff shortages. Parents faced long waits and overcrowding. Officials struggled to manage the situation; Pimpri center faced similar issues.
Web Summary : स्टाफ की कमी के कारण अकूरदी में आरटीई प्रवेश सत्यापन से अराजकता हुई। माता-पिता को लंबे इंतजार और भीड़भाड़ का सामना करना पड़ा। अधिकारियों को स्थिति को संभालने के लिए संघर्ष करना पड़ा; पिंपरी केंद्र में भी इसी तरह के मुद्दे सामने आए।