प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 19:00 IST2026-04-24T18:59:53+5:302026-04-24T19:00:15+5:30
पुणे : पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातील हजारो प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत विस्तारित करावी आणि ...

प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार आवश्यक
पुणे :पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातील हजारो प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी ‘सह्याद्री एक्सप्रेस’ मुंबईपर्यंत विस्तारित करावी आणि ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ला निरा स्टेशनवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य चैतन्य जोशी यांनी केली आहे. मध्य रेल्वे विभागातील सर्व रेल्वे सल्लागार सदस्यांची बैठक मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी पार पडली. या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस केवळ पुण्यापर्यंत मर्यादित असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि कामगार मुंबईला जात असतात. मात्र, ही गाडी पुण्यापर्यंतच असल्याने प्रवाशांना पुण्यात उतरून दुसरी गाडी पकडावी लागते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. जर ही गाडी थेट मुंबईपर्यंत विस्तारित केली, तर प्रवाशांना विनासायास आणि थेट प्रवास उपलब्ध होईल. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने या विषयांची गांभीर्याने दखल कार्यवाही केले तर प्रवाशांना फायदा होणार आहे.
निरा स्टेशनवर महालक्ष्मीचा थांबा आवश्यक :
मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ला पुणे ते सातारा या दरम्यान एकही थांबा नसल्याने या पट्ट्यातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नीरा हे रेल्वे स्टेशन भौगोलिक आणि औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. बारामती, निरा, फलटण, सासवड आणि एमआयडीसी परिसरातील नागरिक या स्टेशनवर अवलंबून आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेसला येथे थांबा मिळाल्यास उद्योजक, नोकरदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे परिसरातील आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही गती मिळेल.