चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 23:25 IST2026-04-24T23:24:46+5:302026-04-24T23:25:38+5:30
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुले आव्हान दिले असता त्यांनी नागपुरातच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुले आव्हान दिले असता त्यांनी नागपुरातच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशातील नागरिकांनी चार मुले जन्माला घालायला हवी व त्यातील एका मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायला हवा असे ते म्हणाले. श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाचा जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
यावेळी बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते असेदेखील म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकूट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते, असा दावा शास्त्री यांनी केला. भारत मातृप्रधान देश आहे. जेव्हा भारतदुर्गा मंदिर बनेल तेव्हा देश शक्तीसंपन्न होईल व अखंड भारत बनेल. पाकिस्तान माता किंवा चीन मातेचा जय असे कधी ऐकले नाही. संपूर्ण जगात फक्त भारतातच मातेचा जयजयकार होतो. जगात महिलांना भोग्य मनले जाते, मात्र भारतात महिलांना पूज्य मानले जाते. भारत देवशक्ती व पुजेकडे परत जात आहे. हे मंदीर पाहून जगातील लोकांना कळेल की भारत शास्त्र व शस्त्रांच्या आधारे चालतो, असेदेखील ते म्हणाले.
कॉर्पोरेट जिहादविरोधात उग्र भूमिका घ्या
यावेळी गोविंददेव गिरी महाराज यांनी नाशिकमधील घटनेवर भाष्य केले. देशात आपल्या आजुबाजूला व देशाबाहेर अनेक दानव आहेत. त्यांना संपविण्याऐवजी शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नाशिकमधल्या कॉर्पोरेट कांडानंतर संताप येत नसेल तर आपण मृतप्राय झालो आहोत की जिवंत आहोत याचा विचार करायला हवा. अशा मानसिकतेच्या लोकांविरोधात उग्र होऊन उभे रहावे लागेल. आपल्या संस्कृतीनुसार शक्तीमान होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.