पुणे विभागात पाणीसाठ्याचा उच्चांक; कोकणात सर्वाधिक कमी, राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:38 IST2026-03-05T18:34:51+5:302026-03-05T18:38:11+5:30
राज्यातील तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये यावर्षी ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या ५७.२२ टक्के साठ्याच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे

पुणे विभागात पाणीसाठ्याचा उच्चांक; कोकणात सर्वाधिक कमी, राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा किती?
पुणे : राज्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या ५७.२२ टक्के साठ्याच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाऊसमान चांगले राहिल्याने धरणांमधीलपाणीसाठा चांगला असल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक पाणीसाठा अपेक्षेनुसार पुणे विभागात असून, सर्वांत कमी साठा कोकण विभागात आहे.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत ३ हजार ११ धरणे असून, त्यामध्ये मोठे प्रकल्प १३८, मध्य प्रकल्प २६२ आणि लघू प्रकल्प २ हजार ६११ आहेत. राज्यात मागील वर्षी ऐन उन्हाळ्यापासून म्हणजेच मेपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दिवसांत पडत असलेल्या पावसाचा जोर एवढा होता की, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणे पूर्ण भरली होती. पावसाळ्याच्या दिवसांत या भागातील धरणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने पाणी नद्यांमधून सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. त्यामुळे या भागातील बहुतांश भागात पूर आले. तर पुणे, कोकण, नाशिक भागातही पावसाचा जोर जास्तच होता. उन्हाळ्याच्या काळात या प्रदेशात पावसाचा जोर कमी होता. मात्र, पावसाळ्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे याही भागातील धरणे तुडुंब भरून नद्यांना पूर आले. या पावसामुळे राज्यातील सर्वच भागाला जोरदार फटका बसल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला.
राज्यात मागील वर्षी पडलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी या वर्षीच्या मार्च महिन्यात सर्वच धरणांमधील पाणीस्थिती भक्कम आहे. कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमध्येसुद्धा सध्या पाणीस्थिती खूपच चांगली आहे. पाण्याचा नियोजनपूर्वक वापर केला तर पावसाळ्याच्या दिवसांपर्यंत पाणी पुरेल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यातील पाणीसाठा (टक्केवारीत)
प्रदेश ---- मागील वर्षीचा----सध्याचा पाणीसाठा
नागपूर --- ५१.९९ ----- -- ६५.८२
अमरावती ---५८.९९ ------ ६५.१५
छत्रपती संभाजीनगर ---५५.८९--- ६६.५८
नाशिक ---- --५८.०४------ ६६.२७
पुणे -------५७.५२------ ६२.९६
कोकण -----६१.९७---- ६०.६१
एकूण पाणीसाठा -----५७.२२----६४.४१
राज्यात एकूण धरणे ---(प्रदेशानुसार)
नागपूर----- ३८५
अमरावती ---२७१
छत्रपती संभाजीनगर --- ९८२
नाशिक --- ५३८
पुणे ----७२२
कोकण ---- १७८
एकूण ---- ३०११
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी.मध्ये)
नागपूर --- ३०५९.७६
अमरावती --२५३१.०४
छत्रपती संभाजीनगर --- ४८३७.९३
नाशिक ---३९४५.३५
पुणे ---९५९६.५०
कोकण ---२२४५.४५
एकूण ----२६२१६.०२