पिंगोरीत अग्नितांडव; भीषण वणव्यात दीड हजार एकर वनसंपदा भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:42 IST2026-04-19T13:24:40+5:302026-04-19T13:42:59+5:30
कडबा जळून शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; जेजुरी परिसरातील खंडोबा डोंगररांगांनाही झळ निष्काळजीपणामुळे पेटणाऱ्या आगी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे

पिंगोरीत अग्नितांडव; भीषण वणव्यात दीड हजार एकर वनसंपदा भस्मसात
नीरा : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी परिसरात भीषण वणव्याने खळबळ उडवली आहे. काही तासांत विक्राळ रूप धारण केलेल्या आगीमुळे सुमारे दीड हजार एकरांवरील वनसंपदा राख झाली आहे. या आगीत शेतकऱ्यांचा जनावरांसाठी साठवलेला कडबाही जळून खाक झाला असून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. निष्काळजीपणामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पर्यावरणासह शासकीय यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
पिंगोरी परिसरातील डोंगररांगांनी पुन्हा एकदा भीषण वणव्याचा सामना केला आहे. उन्हाच्या तडाख्यात कोरड्या पडलेल्या वनक्षेत्रात लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि डोंगरमाथ्यावरून ज्वाळांचे लोळ उसळू लागले. धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे आणि सरपंच संदीप यादव यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत हजारो झाडे, झुडपे, गवताळ प्रदेश आणि नैसर्गिक वनसंपदा आगीच्या विळख्यात सापडली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
वनविभागाच्या माहितीनुसार, सुरुवातीला साकुर्डे हद्दीतील खाजगी डोंगराला आग लागली होती. ही आग शासकीय वनक्षेत्रात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र त्यानंतर कवडेवाडी परिसरातील खंडोबा मंदिरालगतच्या डोंगरभागातही आग भडकली. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दुपारी चार वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
ग्रामस्थांत संतापाची लाट
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, अशा वणव्यांमुळे केवळ झाडेच नाही तर पक्षी, सरपटणारे प्राणी, वन्यजीवांचे अधिवास आणि जैवविविधताही धोक्यात येत आहे.
दोन हजार कडब्याची गंज जळून खाक
यावेळी कवडेवाडी येथील मारुती यादव यांच्या शेतातील सुमारे दोन हजार कडब्याची गंज जळून खाक झाली. उन्हाळ्यासाठी जनावरांच्या चाऱ्याचा साठा पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
या घटनेत अंदाजे एक लाख २ पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी बोबडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून शासकीय मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.
उन्हाळा सुरू होताच पिंगोरी 3 परिसरात वणव्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तुकाईनगर येथेही अशीच आग लागली होती. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ती वेळीच विझवण्यात आली होती.
'पिंगोरी परिसरात वणवा लागू नये, यासाठी जनजागृती केली जाते. मात्र प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे आगीच्या घटना घडतात. ग्रामपंचायतीकडे आग विझवण्यासाठी साधने नसल्याने शासनाने ग्रामीण भागात यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.- संदीप यादव, सरपंच, पिंगोरी