पाणी भरण्याचा वाद अन् थेट वीट डोक्यात; पाणी भरण्याच्या वादातून भावजयला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:54 IST2026-05-17T14:54:28+5:302026-05-17T14:54:40+5:30
दुपारी दीडच्या सुमारास उषा गाडगे यांनी नणंदांना कपडे धुवायचे असतील, तर टाकीवर जाऊन धुवा, असे सांगितले.

पाणी भरण्याचा वाद अन् थेट वीट डोक्यात; पाणी भरण्याच्या वादातून भावजयला मारहाण
वडगाव आनंद : नळाच्या पाईपने पाणी भरण्यावरून झालेल्या घरगुती वादातून दोन नणंदांनी मिळून भावजयीला बेदम मारहाण केल्याची घटना बेल्हे साकुर फाटा (ता.जुन्नर) येथे घडली आहे. या मारहाणीत भावजयीचे डोके फुटले असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी उषा सुनील गाडगे (वय ४४) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नणंद मिराबाई अरुण कणसे (रा.बोटे, ता.संगमनेर) आणि सुनंदा धनराज गायकवाड (रा.बेल्हे) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास उषा गाडगे यांनी नणंदांना कपडे धुवायचे असतील, तर टाकीवर जाऊन धुवा, असे सांगितले. याचा राग आल्याने दोन्ही नणंदांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
वाद वाढल्याने मिराबाई यांनी उषा यांना ढकलून खाली पाडले, तर सुनंदा यांनी हातातील वीट डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. पोलिस हवालदार गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.