Sanjay Raut: प्रताप सरनाईक यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन नाहक त्रास दिला जातोय याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या पत्राचं सार आपल्या लक्षात आला असेलच, प्रताप सरकारनं शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
"प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलंय. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे सर्व अधिकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी वगैरे नाही. आमच्यात फक्त एकच गट आहे आणि तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गट. त्यामुळे राज्यात पाच वर्ष ठाकरे यांच्या नेतृत्वातच सरकार उत्तम काम करणार, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी उत्तम समन्वयानं काम करत आहे", असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी देशासाठी उदाहरण
आघाडी कशी असावी याचं महाविकास आघाडी हे संपूर्ण देशासाठी उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडी ही आदर्श समन्वयाचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात सत्तेचा उत्तम फॉर्म्युला सुरू आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम समन्वय साधून सरकार चालवत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.