सरकारी नोकरीची क्रेझ! ८ वर्षात भारत सरकारकडे २२ कोटी अर्ज, पण नोकरी किती जणांना मिळाली? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:46 PM2022-07-27T18:46:12+5:302022-07-27T18:58:20+5:30

UPSC, SSC आणि IBPS सारख्या सरकारी नोकरी परीक्षा आयोजित करणार्‍या संस्थांनी सुमारे 7.22 लाख उमेदवारांची कायमस्वरूपी नोकरीसाठी शिफारस केली आहे.

सरकारी नोकऱ्यांची आकडेवारी केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. बुधवारी सरकारने सांगितले की, 2014 ते 2022 पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी 22.05 कोटी अर्ज आले आहेत. यामध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा देणाऱ्या एजन्सींनी सुमारे ७.२२ लाख उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ए रेवंत रेड्डी यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. जितेंद्र सिंह यांनी अलीकडेच सांगितले होते की 2020-21 मध्ये UPSC, SSC आणि IBPS च्या माध्यमातून 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

सन २०१४ पासून आतापर्यंत सरकारी खात्यांमध्ये नव्याने भरतीसाठी आलेल्या अर्जांबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी भरतीची आकडेवारी सादर केली आहे. ते म्हणाले की 2014 पासून आतापर्यंत एकूण 22,05,99,238 अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकसभेत त्यांच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना 2021-22 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 60 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, भारत सरकारने देशात रोजगार निर्मितीसाठी अनेक पावले उचलली आहेत.

2014-15 साली 1,30,423 जणांना सरकारी नोकरी मिळाली. 2015-16 मध्ये 1,11,807 आणि 2016-17 मध्ये 1,01,333 जणांना नोकरी मिळाली. 2017-18 साली 76,147 जणांची वर्णी लागली. तर 2018-19 या वर्षात 38,100 जणांना नोकरी मिळाली.

2019-20 या वर्षात 1,47,096 जणांना सरकारी नोकरी मिळाली. 2020-21 मध्ये 78,555 तर 2021-22 या वर्षात 38,850 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे.

नुकतंच पंतप्रधान मोदींनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये नवीन भरतीबाबत सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांतर्गत ही भरती केली जाणार आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली होती की 2020-2021 मध्ये 1,59,615 उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8,913 उमेदवारांची यूपीएससीद्वारे निवड झाली आहे. यानंतर, एसएससीद्वारे 97,914 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे आणि 52,788 उमेदवारांची आयबीपीएसद्वारे निवड करण्यात आली आहे.