चीन, जपानसह भारतातही कोरोनानं डोकं वर काढलं; नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक, हालचाली वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:33 PM2022-12-22T15:33:15+5:302022-12-22T16:35:42+5:30

CoronaVirus In India: भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे.

चीन, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे.

भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपानंतर ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यूपी, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूनेही कोरोनाबाबत आढावा बैठका बोलावल्या आहेत.

गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.

भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ०.०१ टक्के आहे. गेल्या २४ तासंमध्ये उपचाराधीन रुग्णांची सहाने कमी झाली आहे. या आकडेवारीनुसार भारतामध्ये बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची टक्केवारी ही ९८.८० एवढी आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ४२ हजार ४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही १.१९ टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.