Nitin Gadkari: पंतप्रधान मोदी तुमचं खातं का बदलत नाहीत? नितीन गडकरींनी सविस्तर सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:04 PM2021-11-10T19:04:00+5:302021-11-10T19:08:46+5:30

बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ते बऱ्याच काळापासून रस्ते विकास महामंडळाच्या मंत्रीपदी आहेत. गडकरींकडेच हे खातं नेमका देण्यात आलं? आणि ते अद्याप का बदललं गेलं नाही? यावर गडकरींनी उत्तर दिलं आहे.

नितीन गडकरी देशाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्घ मंत्रीपदाचा कामकाज पाहात आहेत. त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं जात असल्याचंही आपण पाहिलं आहे. नुकतंच त्यांनी 'टाइम्स नाऊ'च्या एका विशेष कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी मुलाखतीत त्यांनी मनमोकळेपणानं उत्तरं दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बहुतांश मंत्र्यांच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजेच त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पण नितीन गडकरी यांचं खातं काढून घेण्यात आलेलं नाही किंवा त्यांना इतर दुसरं कुठलं खातं देखील दिलं जात नाही. याबाबत खुद्द नितीन गडकरींनाच विचारण्यात आलं.

नितीन गडकरींनी म्हणाले की, "१९९५ साली जेव्हा महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये मी मंत्री झालो तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. माझ्याकडे पीडब्ल्यूडी खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. माझ्या कार्यकाळात ५५ उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मुंबई-पुणे महामार्ग हे तीन प्रकल्प पूर्ण केले"

"त्यानंतर जेव्हा केंद्रात अटलजींचं सरकार बनलं. त्यात माझ्याकडे गावांना जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेवर काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. या कामात मी स्वत:ला झोकून दिलं. देशाच्या विकासाठी हे मी माझं कर्तव्य समजतो", असं गडकरी म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांचं भलं व्हावं हीच माझी धारणा आहे. पंतप्रधान मोदींनी संधी दिली आणि गंगेचं शुद्धीकरणाचं काम करण्याचं भाग्य लाभलं, असंही गडकरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला आत्मनिर्भर करण्याची जी संकल्पना आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही दृढ निश्चयानं काम करत आहोत. देशाच्या विकासासाठी कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं गडकरी म्हणाले. तसंच देशात प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी आम्ही आता विविध फ्यूअल पर्यायांवर काम करत आहोत.

मिथेनॉलचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईळ याचे प्रयोग केले जात आहेत. अन्नदाता शेतकरी उर्जादाता देखील व्हावा अशी आमची इच्छा आहे, अशी कामांची यादीच गडकरींनी वाचून दाखवली आणि मंत्रीपदासाठी त्यांची योग्यता अप्रत्यक्षरित्या सिद्ध करुन दाखवली.

नितीन गडकरी यांना त्यांच्या ड्रिम प्रोजेक्टबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी दिल्ली-मुंबई १३५० किमी लांबीचा एक्स्प्रेस-वे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं म्हटलं. संपूर्ण जगातील मेगा प्रोजेक्ट पैकी हा एक प्रोजेक्ट असणार आहे. याशिवाय देशात २२ ग्रीन कॉरिडोअर बनत आहेत, असंही गडकरींनी सांगितलं.

दिल्ली ते देहरादून, दिल्ली ते कटारा, दिल्ली ते श्रीनगर हे ग्रीन कॉरिडोअर ड्रीम प्रोजेक्ट आहेत, असं गडकरी म्हणाले. येत्या काळात पेट्रोल आणि इलेक्ट्रीक कारच्या किमती बरोबरीच्या असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.