CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:39 AM2020-09-07T08:39:53+5:302020-09-07T08:55:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे.

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशामध्ये रविवारी कोरोनाचे ९०,६३२ नवे रुग्ण आढळले असून हा आजवरचा उच्चांक आहे. एका दिवसात ९० हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडलेला भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.

देशात आता रुग्णांची एकूण संख्या ४१ लाखांवर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ३१ लाख ८० हजारांहून जास्त झाली आहे. १४ दिवसांत रुग्णसंख्या ११ लाखांनी वाढली.

सर्वाधिक रुग्ण संख्येत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. सोमवारी भारत ब्राझीलवर मात करून दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत ६४,३२,१०३ तर ब्राझीलमध्ये ४१,२३,००० रुग्ण आहेत. भारताची संख्याही ४१,१३,८११ झाली आहे. कोरोना विषाणुचा सर्वाधिक संसर्ग आरोग्य कर्मचाऱ्यांना झाला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे.

AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोना व्हायरसचं हे संकट 2021 पर्यंत असणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिल्लीसह देशातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील म्हटलं आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया हे केंद्र सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्समधील एक अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं आहे.

कोरोनाचं हे महाभयंकर संकट 2021 पर्यंत जाईल असं आपण सांगू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत होता तो मात्र कमी झाला आहे हे निश्चित सांगता येईल असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

"काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशातील काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील दिसून येत आहे."

"कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे कोरोना चाचण्यांची वाढवण्यात आलेली संख्या आणि दुसरं म्हणजे लोक नियमांचं पालन करत नाहीत."

कोरोनावर मात करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी आशा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतात तीन स्वदेशी लसींसह अनेक गोष्टींवर संशोधन सुरू आहे.

कोरोनावर लस उपलब्ध होण्यासाठी काही महिने लागू शकतात. तसेच लस सुरक्षित असणंही महत्त्वाचं असल्याचं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील तब्बल ८७ हजार तर महाराष्ट्रतील २४ हजार ४८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी राज्यातील २९२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून सलग आठवडाभर रूग्ण संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३२८ जण दगावले. दिवसभरात ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

Read in English