CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! "देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही पण..."; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:08 AM2022-06-10T09:08:47+5:302022-06-10T09:28:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारीही ही आकडेवारी वाढली असून 7 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संकटात आता मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जोपर्यंत कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट सापडत नाही तोपर्यंत कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) भारतात येणार नाही असं म्हटलं आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ रोमेल टिक्कू म्हणाले की, कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट सापडत नाही तोपर्यंत देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा व्हेरिएंट आधीपेक्षा वेगळा असायला हवा.

"लोक आता पर्यटनासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत आहेत आणि जीवन पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत" असंही म्हटलं आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

डॉ. टिक्कू यांच्या म्हणण्यानुसार, देशात पर्यटनाशी संबंधित घटना वाढल्यामुळे कोविड-19 ची प्रकरणे वाढली आहेत. कारण लोक जागोजागी फिरत असतात. मात्र, ते म्हणाले की, कोरोना महामारी आता स्थानिक आजार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे कोरोनाचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाही.

"जोपर्यंत कोरोना साथीचा संसर्ग थांबत नाही, तोपर्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणतीही सामान्य लक्षणे नसल्यास आणि जास्त समस्या नसल्यास, ही प्रकरणे न्यूमोनिया म्हणून पहावी लागतील."

"आपण जास्त काळजी करू नये. पण मी म्हटल्याप्रमाणे, हा आजार बराच काळ आपल्यासोबत राहणार आहे, त्यामुळे सावधगिरी आणि दक्षता हाच यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे" असं देखील टिक्कू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे.

भारतातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने 32 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 असल्याचं म्हटलं जात आहे.

सात जूनला चार हजार, आठ जूनला पाच हजारांहून अधिक आणि आता सात हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे.

महाराष्ट्रातील सर्विलान्स अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे.

सध्या वाढणारी कोरोना प्रकरणे ही तिसरी लाट आणणाऱ्या ओमायक्रॉनचे सर्व प्रकार आहेत. पुढील काही आठवडे केसेस वाढतील, मात्र नंतर ते कमी होऊ लागतील असं ही सांगितलं. मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

राज्य कोविड टास्क फोर्सचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, सध्या बहुतेक प्रकरणे अतिशय सौम्य आहेत. याला चौथी लाट म्हणणं खूप घाईचे आहे.