coronavirus: दिलासादायक! भारतातील कोरोनाची साथ फेब्रुवारीत येणार संपुष्टात, तज्ज्ञांनी दिलं हे कारण

By बाळकृष्ण परब | Published: December 17, 2020 12:44 PM2020-12-17T12:44:29+5:302020-12-17T13:00:37+5:30

coronavirus India : कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घसरण होऊ लागल्याने आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतातील कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.

जवळपास आठ ते नऊ महिने धुमाकूळ घातल्यानंतर आता भारतातील कोरोनाचा फैलाव उतरणीला लागला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घसरण होऊ लागल्याने आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतातील कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. याला तज्ज्ञांनीही दुजोरा दिला असून, त्यामागची काही कारणंही दिली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशात कोरोनाच्या एका निदान झालेल्या रुग्णामागे सुमारे ९० रुग्णांचे निदान होऊ शकलेले नाही. सप्टेंबर महिन्यापर्यंत हे प्रमाण ६० ते ६५ रुग्णांपर्यंत होते. एकीकडे दिल्ली आमि केरळमध्ये एका रुग्णामागे सुमारे २५ रुग्णांचे निदान होऊ शकले नाही. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हेच प्रमाण ३०० पर्यंत राहिले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या त्याच पॅनेलने ही आकडेवारी दिली आहे. ज्याने भारतासाठी खास सुपरमॉडेल बनवून फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातून कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असे सांगितले होते. या पॅनेलने राज्यवार आकडे सांगून हेसुद्धा सांगितले की, बहुतांश राज्यांमध्ये निदान झालेल्या प्रत्येक रुग्णामागे ७० ते १२० रुग्णांचे निदान होऊ शकलेले नाही.

एकंदरीत देशामध्ये एका रुग्णामागे सुमारे ९० रुग्णांचे निदान झालेले नाही. याचाच अर्थ भारतामध्ये बहुतांश लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. मात्र त्याचे निदान झाले नाही. यूके आणि इटलीसारख्या देशांमध्ये हेच प्रमाण केवळ १० ते १५ एवढेच राहिले आहे. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या पीकवेळी ४३ रुग्णाचे निदान झाले नाही. तर तिसऱ्या पीकवेळी दिल्ली सरकारने अधिकाधिक टेस्टिंग करण्याची तयारी केली होती.

हैदराबाद आयआयटीसह वेल्लूर, कोलकाता, बंगळुरू या विज्ञान संस्थांच्या तज्ज्ञांचा या पॅनेलमध्ये समावेश आहे. त्यांचे विश्लेषण मेडिकल रिसर्चच्या जर्नलमध्ये प्रकाशिक करण्यात आला आहे.

या पॅनलने आपल्या सुपरमॉडेलनुसार सांगितले की, फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतामधून कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात पुन्हा कोरोनाचा पीक किंवा दुसरी लाट येणार नाही. तसेच फेब्रुवारीपर्यंत देशात केवळ २० हजार अॅक्टिव्ह केस राहणार आहेत. त्याचं कारण म्हणजे ज्या रुग्णांचे निदान होऊ शकले नाही. अशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या पॅनलच्या म्हणण्यानुसार भारतातील ६० टक्के लोकसंख्या कोरोनामुळे बाधीत झाली आहे किंवा त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. विश्लेषणात सांगण्यात आले की, ६० टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. हा अंदाज सणावारांच्या दिवसांमध्ये गर्दी होऊनही अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले नाहीत, या आधारावर वर्तवण्यात आला आहे. मात्र दिल्लीत रुग्णसंख्या वाढली. तसेच उत्तराखंड आणि मेघालयमध्येही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

या आकडेवारीचा विचार केल्यास भारतात जर कोरोनाचा पुन्हा पीक आला नाही, तर ते वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. सध्या यूकेमध्ये पुन्हा एकदा पीक आला आहे. तर जर्मनी आणि स्वीडनमध्ये हर्ड इम्युनिटीनंतरही पुन्हा लॉकडाऊन करावे लागले आहे. तर भारतामध्ये मात्र सप्टेंबरमध्ये पीक दिसून आला. त्यानंतर देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने घटत चालली आहे.

या पॅनेलमधील अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर द प्रिंटने सांगितले की, भारतामध्ये ज्या असुविधा होत्या त्यामुळे खूप फायदा झाला. उदाहरण म्हणजे जर्मनीमध्ये कडक लॉकडाऊन असताना लोक घराबाहेर पडले नाहीत. मात्र भारतात एक महिन्याच्या लॉकडाऊननंतर सगळे संकेत कोलमडून पडले. लोक केवळ घराबाहेरच पडले नाहीत तर त्यांनी मास्क परिधान करण्यामध्येही टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

याचा अर्थ असा की, जर्मनीसारख्या देशात जिथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या कोरोनाबाधित झालेले नाहीत. तर भारतात अधिकाधिक लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र त्यांची ओळख पटू शकलेली नाही. अजून एक कारण म्हणजे दक्षिण आशिया आणि आफ्रिका खंडात कोरोनाचा प्रभाव तुलनेने कमी दिसून आला. येथील तरुण लोकसंख्येचे मोठे प्रमाण हे त्याचे कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत देशात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येण्याची शक्यता आहे.