Atal Bihari Vajpayee: वाजपेयींनी नेहरुंचा फोटो पुन्हा लावायला सांगितलेला, कसे करायचे भाषणाची तयारी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 02:28 PM2021-12-25T14:28:27+5:302021-12-25T14:38:02+5:30

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणाचे युगपुरुष का म्हटलं जातं हे पटवून देणारे त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रसंग आहेत. विरोधी पक्षातील नेतेही वाजपेयींचा सन्मान करायचे. याचाच एक किस्सा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांच्या फोटोशी निगडीत आहे.

अटल बिहारी वाजपेयी स्व:पक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांचाही आदर आणि सन्मान करायचे. आज अटल बिहारी वाजपेयींची ९७ वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याशी निगडीत काही निवडक किस्से जाणून घेऊयात...

१९७७ साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार स्विकारला तेव्हा साऊथ ब्लॉक येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात गेले. या कार्यालयात ते याआधीही आले होते. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच समोर दिसणारा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ आपल्या सचिवांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा फोटो जाणूनबुजून काढण्यात आल्याचं त्यांना कळालं.

कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो पाहणं कदाचित वाजपेयी यांना आवडणार नाही या उद्देशातून तो काढून टाकण्यात आला होता. वाजपेयींनी तात्काळ नेहरुंचा फोटो आहे त्या ठिकाणी पुन्हा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राजकारणात विरोधी पक्षातील नेते देखील वाजयेपींचा सन्मान करायचे. याचंच उदाहरण किंगशुक नाग यांच्या 'अटलबिहारी वाजपेयी-अ मॅन फॉर ऑल सीझन' या पुस्तकात नमूद करण्यात आलेलं आहे.

वाजपेयींवरील याच पुस्तकातील माहितीनुसार एकदा नेहरुंनी भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांना वाजपेयींची ओळख करुन देताना महत्त्वाचं विधान केलं होतं. "अटल बिहारी वाजपेयी हे आमच्या विरोधी पक्षातील एक युवा नेते असून सभागृहात नेहमी माझ्यावर टीका करत असतात. पण मला यांचं भविष्य खूप उज्ज्वल असल्याचं दिसून येतं", असं नेहरु म्हणाले होते.

अटल बिहारी वाजपेयी एक उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कधीच आपलं भाषण लिहून काढलं नाही. ते नेहमी कोणत्याही विषयावर उत्फूर्तपणानं बोलायचे. वाजपेयींचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेल्या शक्ती सिन्हा यांनी याबाबतचा एक किस्सा बीसीसीला दिलेल्या मुलाखतीत कथन केला होता.

"अटलजी कधीच आपल्या भाषणाची लेखी तयारी करत नसत. जे काही लोकांसमोर बोलायचं आहे ते कधीच लिहून काढत नसत. संसदेच्या संग्रहलायतून किंवा वृत्तपत्रांमधून आवश्यक ते मुद्दे नमूद करुन ते थोडीफार तयारी करायचे", असं शक्ती सिन्हा यांनी सांगितलं.

संसदेत भाषण करण्यासाठी मिळणाऱ्या वेळेचं महत्त्व त्यांना अगदी व्यवस्थित माहित होतं. त्यामुळे वेळेचा पुरेपूर सदुपयोग करण्यासाठी ते केवळ महत्त्वाचे मुद्दे नमूद करुन घेत असत. त्यांनी कधीच भाषणाची ठरवून अशी पूर्ण तयारी केलीच नाही, असंही ते म्हणाले.

लोकसभेचे माजी अध्यक्ष अनंतशायनम अय्यंगर यांनीही एकदा लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांचं कौतुक करताना संसदे वक्त्यांमध्ये इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटल बिहारी वाजपेयी यांचा हात कुणीही पकडू शकत नाही, असं म्हटलं होतं.