2023 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे, सहा संकटे, भारताने चढाई केली तर...; प्रोफेसर मुक्तदर खान काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:49 PM2023-01-19T12:49:17+5:302023-01-19T12:57:39+5:30

पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदींनी लोक पुरते त्रस्त झाले आहेत. पीओकेमध्ये लोक भारतात येण्यासाठी आंदोलन करत आहेत.

पाकिस्तानमध्ये येत्या काही महिन्यांत मोठा गदारोळ उडणार असून २०२३ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे होऊ शकतात अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. पाकिस्तानवर एक दोन नाहीत तर सहा संकटे उभी ठाकली आहेत. अशातच जर भारताने पाकवर चढाई केली तर त्याहून मोठी संकटे उभी ठाकणार असल्याचेही म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदींनी लोक पुरते त्रस्त झाले आहेत. पीओकेमध्ये लोक भारतात येण्यासाठी आंदोलन करत आहेत. अशातच विश्लेषकांच्या अंदाजानुसार लवकर काहीतरी केले नाही तर पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार आहेत.

अमेरिकेतील डेलावेर विद्यापीठातील इस्लामिक स्टडीज प्रोग्रामचे संस्थापक संचालक प्रोफेसर मुक्तदार खान यांनी ही शक्यता वर्तविली आहे. पाकिस्तान सध्या सहा संकटांचा सामना करत आहे. भारताला वाटले तर तो युद्ध घोषित करून पीओके आणि इतर भाग स्वतःमध्ये विलीन करू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय संकट, आर्थिक संकट, सुरक्षा संकट, सिस्टिम संकट, इज्जतीचे संकट आणि पर्यावरण संकट अशी ही संकटे आहेत. मुक्‍तदार खान यांनी म्‍हणाले की, 2023 मधील या संकटांमुळे पाकचे तुकडे होऊ शकतात किंवा देशातील सर्व सरकारी संस्था निकामी होऊ शकतात.

पाकिस्तानमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर हजारो निर्वासित बाहेर पडू लागतील आणि जगभरात जातील. भारतावर त्याचा मोठा परिणाम होईल.

'इमरान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. इम्रान खान कधी मोर्चे काढत आहेत, कधी भाषण देत आहेत, असा विचित्र राजकीय तमाशा देशात झाला आहे. हे राजकीय संकट सरकारला नीट चालवू देत नाहीये. खुद्द पाकिस्तान सरकारच इम्रान खान यांच्यासोबत अर्धा वेळ राजकीय फुटबॉल खेळत आहे. त्याला सरकार चालवायला कुठे वेळ आहे.' असे ते एका व्हिडीओत म्हणाले आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाई खूप आहे. विकास दर देखील खूप कमी झाला आहे. निर्यातही घटलीय, त्यामुळे अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वात मोठी अडचण अशी की, त्यांना कशाचीही गरज भासली तर ते परदेशातून खरेदी करू शकत नाहीत. डीफॉल्टमधून वर येण्यासाठी 10-20 वर्षे लागतात, असे प्रोफेसर म्हणाले.

पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. एक म्हणजे सीमेवर तालिबान आणि दुसरे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान. TTP ने खरे तर स्वतःचे वेगळे सरकार घोषित केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात दोन सरकारे सुरू आहेत. पाकिस्तान सरकारने टीटीपीविरुद्ध युद्ध सुरू केले तर ते अफगाणिस्तानात पळून जातील. परंतू तालिबान पाकिस्तानवर आक्रमण करेल, अशी स्थिती आहे.

भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर तो आपल्याला हवा तो प्रदेश आरामात घेऊ शकतो. पाकिस्तानने आपले अर्धे सैन्य तालिबानशी लढण्यास लावले आहे. निम्मे सैन्य घेऊन भारताशी कोणते युद्ध लढणार असाही प्रश्न आहे. परंतू भारत पाकिस्तानसारखा कुटील विचार करणारा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

लष्कर जणू काही वेगळं सरकार चालवतंय. पाकिस्तानात लोकांचे सरकार आहे, लष्कराचे सरकार आहे, टीटीपीचे सरकार चालत आहे, ही परिस्थिती अतिशय गोंधळात टाकणारी आहे. जे लोक TTP प्रभावित भागात राहतात त्यांच्यासाठी सरकार कोण आहे? हेच कळत नाहीय. पाकिस्तानचे व्यवस्थेचे संकट आहे, जे संपवण्यासाठी त्याला राज्यांची पुनर्रचना करावी लागेल. लष्करालाही बदलावे लागणार आहे.

पर्यावरणीय संकट या सर्व मानवनिर्मित संकटांना वाढवत आहे. पाकिस्तानात वारंवार येणारी वादळं, पूर, भूकंप देशाला कचाट्यात नेण्याचे काम करत आहेत. या सर्वांनी सरकारसमोर आव्हान उभे केले आहे, ते अर्थव्यवस्थेवर भार टाकतात. 2023 हे वर्ष पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असे मुक्तदर खान यांनी म्हटले आहे.