चिंता वाढली! शाळा सुरू झाल्यावर आता चिमुकले पडताहेत आजारी; कोरोना नाही तर 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:34 PM2022-04-13T15:34:07+5:302022-04-13T15:44:40+5:30

लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना महामारीबाबत लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. शाळांमध्ये पुन्हा मुलं परतली आहेत. पण याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचं दिसून येत आहे.

हे कोणत्याही विशिष्ट ठिकाणी किंवा परिसरात घडत नसून, देशभरात अचानक मुले आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी कोरोना विषाणू थेट जबाबदार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुलांच्या प्रतिकारशक्तीमुळे हे घडत आहे. कोरोनाच्या वेळी लॉकडाऊन आणि निर्बंध असताना मुले बहुतेक घरातच राहिली आणि आता ती बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत मुलांच्या शरीराला बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागत असल्याने ते वारंवार आजारी पडत आहेत.

मुलांमध्ये खोकला, एलर्जी, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाच्या समस्या आणि पचनाच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे अनेक बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. या समस्या लहान मुलांमध्ये आणि ज्यांना याआधी त्रास झाला आहे त्यांच्यामध्ये अधिक दिसून येत आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोविड-19 महामारीचा मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी जवळपास दोन वर्षे मुलांना जास्त बाहेर पडू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे.

लहान मुले शाळा, उद्याने आणि इतर मोकळ्या जागेत खेळताना किंवा समाजात असताना धूळ, व्हायरस आणि सूक्ष्म कणांच्या संपर्कात येतात. ते शरीरात अँटीबॉडीज तयार करतात आणि हानिकारक व्हायरस, बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बालरोग विभागाचे प्रमुख संचालक डॉ. कृष्णा चुघ यांनी लॉकडाऊन दरम्यान आणि घरात राहिल्यामुळे मुलांच्या शरीराला या नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या प्रक्रियेतून जाण्याची संधी मिळाली नाही.

आता शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुले बाहेर पडली आहेत, त्यांच्या शरीरावर अचानक या गोष्टींचा हल्ला होऊन ते पुन्हा पुन्हा आजारी पडत आहेत. अशा परिस्थितीत पालकांना सावध असणं गरजेचं आहे.

डॉ. आशिष थिटे, पारस जेके हॉस्पिटल, उदयपूरचे बाल विशेषज्ञ सांगतात की, आजकाल 10 पैकी 8 मुले त्यांच्या ओपीडीमध्ये अशाच तक्रारी घेऊन येत आहेत, तर गेल्या दोन वर्षांत ही प्रकरणे खूपच कमी होती.

नारायण हेल्थ, अहमदाबाद येथील बालरोगतज्ञ डॉ. उर्वशी राणा देखील अशा प्रकरणांमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगतात. आजारी पडण्याच्या तक्रारी मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसतात कारण प्रौढांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते.

मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनू उदानी सांगतात की, लहान मुलांमध्ये लहान आजारांच्या बहुतांश घटनांमध्ये काळजी करण्यासारखे काही नाही. 7 वर्षांखालील मुलांना वर्षातून 7-8 वेळा विषाणूजन्य संसर्ग होणे सामान्य आहे.

फोर्टिसचे डॉ. चुघ म्हणाले की, लहान मुलांमध्ये असा संसर्ग अनेकदा गंभीर नसतो. फक्त काही मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. ते टाळण्यासाठी बहुतेक मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या टॉनिकची गरज नसते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फक्त चिमुकल्यांच्या स्वच्छतेची आणि जेवणाची काळजी घ्या. संतुलित आहार दिला पाहिजे. ते पीत असलेले पाणी स्वच्छ असले पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. शाळेसाठी पाणी घरूनच घेणे चांगले असं म्हटलं आहे.

शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे वापरताना ते स्वच्छ असल्याची खात्री करा. रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा कारण उन्हाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. आरोग्याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.