‘भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार हे इराण ठरवणार का?’ इस्राइलच्या राजदूतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 20:38 IST2026-03-14T20:36:42+5:302026-03-14T20:38:13+5:30
Iran War: इस्राइलचे भारतामधील राजदूत रुवेन अजार यांनी भारतीयांना एक सवाल विचारला आहे. भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार, हे इराण ठरवणार का? असा सवाल रुवेन अजार यांनी विचारला आहे.

‘भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार हे इराण ठरवणार का?’ इस्राइलच्या राजदूतांचा सवाल
अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणविरोधातयुद्धाला सुरुवात केल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे. या नाकेबंदीमुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असून, भारतामध्येही तीव्रपणे गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या गॅस संकटादरम्यान, इराणने परवानगी दिल्यानंतर एलपीजी घेऊन येणारी दोन जहाजे होर्मुझच्या आखातातून भारताकडे रवाना झाली आहेत. या अनिश्चिततेदरम्यान, इस्राइलचे भारतामधील राजदूत रुवेन अजार यांनी भारतीयांना एक सवाल विचारला आहे. भारतीय पुढचं जेवण कधी बनवणार, हे इराण ठरवणार का? असा सवाल रुवेन अजार यांनी विचारला आहे.
इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये सहभागी झालेल्या रुवेन अजार यांनी सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून इस्राइलने इराणच्या १५ हजार लष्करी ठिकाणांवर हल्ला केला आहे. आम्ही संपूर्ण पश्चिम आशियावर हल्ला करत नाही आहोत. तर आम्ही आपल्या देशाची काळजी करत आहोत. काही शक्ती आम्हाला संपवू इच्छित असलीत तर आम्ही त्यांना संपवल्याशिवाय माघार घेणार नाही. तसेच जर आम्ही यात यशस्वी झालो तर केवळ आम्हीच सुरक्षित राहणार नाही तर भारतसुद्धा सुरक्षित होईल, असे अजार म्हणाले.
इराणचा पाडाव केल्यावर भारत सुरक्षित कसा राहील हे समजावून सांगताना रुवेन अजार यांनी सांगितले की, भारतात पुढचं जेवण कधी शिजणार, हे इराण ठरवणार, अशा स्थितीत अडकायला तुम्हाला आवडेल का? जर इराणने हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर अशी परिस्थिती निर्माण होईल. इराण मानवी संहाराची हत्यारे घेऊन सज्ज झालेला आहे. तसेच तुम्ही काणाडोळा करावा अशी त्यांची इच्छा आहे. अशा स्थितीत काही होणार नाही, अशा कल्पनेमध्ये तुम्ही राहू शकता. मात्र इराण आमच्यावर मागच्या ४० वर्षांपासून हल्ले करत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पुढचं जेवण कधी बनवणार हे तुमच्या या कथित मित्राने ठरवावं, अशी तुमची इच्छा आहे का? निश्चितपणे ही बाब तुम्हाला आवडणार नाही, असेही अजार यांनी सांगितले.