बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:03 IST2026-05-04T14:53:31+5:302026-05-04T15:03:38+5:30
TMC MP Saayoni Ghosh: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत खासदार सायनी घोष यांनी गायलेलं गाणं गेम चेंजर ठरले असल्याचे म्हटलं जात आहे.

बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायनी घोष यांचे एक गाणे प्रचंड व्हायरल झाले होते.'हृदय मा छे काबा, नयने मदीना' या ओळींनी तृणमूलला अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करण्यात मदत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निकालानुसार या गाण्यामुळे झालेल्या हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाने भाजपचा बंगालमधील सत्तेचा मार्ग मोकळा केला. भाजप १९३ जागांवर आघाडीवर असून ममता बॅनर्जी यांची टीएमसी १०० जागांच्या आकड्याखाली आहे.
३३ वर्षीय सायनी घोष या जादवपूरच्या खासदार असून, त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांचे एक प्रसिद्ध लोकगीत गायले होते. सायनी घोष यांच्या या गाण्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला प्रत्युत्तर देताना, "बंगालची ओळख काबाशी नाही, तर माता कालीशी आहे. आमच्या हृदयात महाकाली आणि डोळ्यात चैतन्य महाप्रभु आहेत," असं म्हटलं होतं.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ममता बॅनर्जी यांना सनातन विरोधी ठरवत या गाण्यावरून निशाणा साधला होता.
ध्रुवीकरणाचा भाजपला मोठा फायदा
राजकीय विश्लेषकांच्या मते, सायनी घोष यांच्या गाण्याने बंगालच्या राजकारणात टोकाचे ध्रुवीकरण घडवून आणले. आतापर्यंत दीदींसोबत असलेला हिंदू मतांचा मोठा वाटा या एका गाण्यामुळे आणि भाजपच्या काली विरुद्ध काबा या प्रचारामुळे भाजपकडे वळला. सायनी घोष यांना आपल्या गाण्यामुळे फटका बसत असल्याचा अंदाज आला, तेव्हा त्यांनी हनुमान चालीसा पठण करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
कोण आहेत सायनी घोष?
सायनी घोष यांनी इच्चे दाना या टेलिफिल्ममधून कारकिर्दीची सुरुवात केली होती. आसनसोल दक्षिण मतदारसंघातून त्यांना भाजपनेत्या अग्निमित्रा पॉल यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. जादवपूर मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या डॉ. अनिर्बान गांगुली यांचा २.५० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून २९४ जागांपैकी भाजप १३२ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा आणि सायनी घोष यांचे काबा-मदीना गाणे या निवडणुकीत गेमचेंजर ठरले असून, अखेर बंगालमध्ये कमळ फुलताना दिसत आहे.