नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. मात्र, रशियाकडून एस-400 मिसाईल खरेदी करण्यावर भारत ठाम राहिला. आम्हाला देशहितासाठी जे योग्य वाटेल ते करणार, असा स्पष्ट संदेश जयशंकर यांनी पॉम्पिओना दिल्याने अमेरिकेच्या धमक्यांना भारत घाबरत नसल्याचे दाखवून दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारताला रशियाकडून मिसाईल विरोधी क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करू नये, परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या होत्या. या पार्श्वभुमीवर ही बैठक महत्वाची मानली जात होती. भारताच्या दोन्ही बाजुला शत्रूराष्ट्रे असल्याने भारताला एस-400 सारख्या मिसाईलची गरज आहे. यामुळे अमेरिकेने कितीही आटापिटा केला तरीही भारत रशियाकडून ही प्रणाली खरेदी करणारच, असा बाणा सरकारने दाखवून दिला.
यामुळे अखेर माईक पॉम्पियो यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदींची स्तुती केली. भारत आणि अमेरिकेचे अनेक बाबतीत सहकार्य आहे. ते आणखी मजबूत करण्यात येईल. द्विपक्षीय संबंधांद्वारे व्यापार, अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि संरक्षण मजबूत करणार आहोत. तसेच एस-400 डीलवर बोलताना पॉ्म्पियो म्हणाले की, कधी असे झाले नाही की मतभेद सोडविण्यासाठी रस्ता मिळाला नाही. आम्ही आमच्या देशासाठी संरक्षण पुरविण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसेच भारतही सुरक्षित रहावा असे वाटते. चांगल्या संबंधांमुळे मी आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे दोनच असे नेते आहेत जे वेळ पडल्यास जोखिम पत्करण्याची हिंमत ठेवतात, असेही पॉम्पिओ यांनी सांगितले. येत्या 28-29 जूनला जपानमध्ये जी-20 शिखर सम्मेलन होणार आहे. यावेळी मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे.