ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; रेल्वे स्थानकावरील थरार CCTV मध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:43 IST2026-05-05T18:23:45+5:302026-05-05T18:43:37+5:30
बिहारमध्ये झालेल्या या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; रेल्वे स्थानकावरील थरार CCTV मध्ये कैद
Bihar Railway Accident: बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूर जंक्शनवर सोमवारी एक हादरवणारी घटना घडली. रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांचा भरधाव ट्रेनखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे स्थानकावर एकच खळबळ उडाली असून, ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय इंतर देवी या आपल्या भाचीला रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आल्या होत्या. पाटण्याच्या दिशेने जाण्यासाठी त्या रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्या दिशेने जात होत्या. त्याच वेळी न्यू फरक्का एक्सप्रेस अत्यंत वेगाने प्लॅटफॉर्मवरून गेली.
ट्रेन इतक्या वेगाने आली की या महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. एका प्रवाशाने प्लॅटफॉर्मवरून आपला हात पुढे करून त्यांना वर ओढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. दोन्ही महिला इंजिनच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचा जागीच अंत झाला.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
मृत महिला बख्तियारपूर येथे एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या. ज्या घरात लग्नाचा उत्साह होता, तिथे आता या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. इंतर देवी या गया जिल्ह्यातील मानपूरच्या रहिवासी होत्या, तर संगीता देवी या रामनगर दियारा येथील रहिवासी होत्या.
स्थानकावर तणाव आणि रेल्वे पोलिसांची कारवाई
अपघातानंतर स्थानकावर मोठी गर्दी जमा झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जीआरपी आणि आरपीएफच्या तुकड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
ओव्हरब्रिजची मागणी ऐरणीवर
बख्तियारपूर स्थानकाच्या टोकावर मुख्य प्रवेशद्वार आणि बुकिंग काउंटर असल्याने तिथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, जवळच ओव्हरब्रिज नसल्यामुळे प्रवासी घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. या जीवघेण्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी येथे तातडीने ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.