पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, मदत साहित्य वितरणास गती द्यावी - मल्लिकार्जुन खरगे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:06 AM2021-05-10T06:06:06+5:302021-05-10T06:11:06+5:30
मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीचा वापर करावा
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीचा सामूहिकपणे मुकाबला करण्यासाठीची रूपरेखा आखण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी असा आरोप केला की, केंद्र सरकार जनतेप्रती आणि स्थितीच्या आवश्यकतेनुसार सामूहिक आणि सहमतीने प्रयत्न करण्याची जबाबदारी टाळत असल्याचे दिसते, तसेच त्यांनी कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेले संकटाचे निवारण करण्यासाठी सहा कलमी सूचनाही केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय एकट्याने स्थिती हाताळू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. साथीचा सामूहिकपणे मुकाबला करण्यासाठीची रूपरेखा आखण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात यावी, अशी माझी विनंती आहे. तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी ही चांगली संधी असेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष करण्यात आले आहे, असे खरगे यांनी या पत्रात नमूद केले आहे. अभूतपूर्व संकटासंदर्भात तीव्र चिंता आणि नाराजी कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे.
पंतप्रधानांना केलेल्या सहा सूचना...
१) सर्वपक्षीय बैठक बोलवा
२) मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीचा वापर करावा
३) लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिवार्य परवाने द्यावेत
४) लस, पीपीई, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि सॅनिटायझरवरील जीएसटीत सूट द्यावी
५) मदत साहित्य वितरणास गती द्यावी आणि साहित्य कोठे पाठविले हे स्वयंस्फूर्तपणे जाहीर करावे
६) मनरेगाअंतर्गत कामाचे दिवस किमान दोनशे दिवस करा
समित्यांची व्हर्च्युअल बैठक बोलवा
राज्यभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना दिलेल्या पत्रात संसदीय स्थायी समित्यांची व्हर्च्युअल बैठक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. लोकांच्या दशेबाबत संसद निमूट राहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणविषयक स्थायी समितीशी संबंधित विभागाच्या १२३ व्या अहवालाकडे सभापती नायडू यांचे लक्ष वेधले आहे. या अहवालात कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत.