देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:50 IST2026-02-05T17:50:10+5:302026-02-05T17:50:23+5:30
Parliament Session Narendra Modi: 'काँग्रेसकडे संधी होती, त्यांनी ती गमावली; अशा स्थितीत देश त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल?'

देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी
Parliament Session Narendra Modi: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.5) विरोधकांच्या वॉकआउटनंतरही आपले भाषण सुरू ठेवले. विरोधकांच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेसकडे ना इच्छाशक्ती होती, ना स्पष्ट दृष्टिकोन होता. त्यांनी संधी गमावली आहे; अशा स्थितीत देश त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल?
जागतिक ट्रेड डील्सचा उल्लेख
पंतप्रधान मोदी यांनी युरोपियन युनियन ते अमेरिकेसोबतच्या अलीकडील व्यापार करारांचा (ट्रेड डील्स) उल्लेख करत म्हटले की, आज संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे. जागतिक अस्थिरतेबाबतची चिंता कमी झाली असून, आपल्या युवकांसाठी जागतिक बाजार खुले झाले आहेत. त्यांनी असेही नमूद केले की, विकसित देश विकसनशील देशाशी करार करतात, ही मोठी बाब आहे.
देशहितापेक्षा स्वतःचीच चिंता
पंतप्रधानांनी काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि डाव्या पक्षांचा उल्लेख करत सांगितले की, हे पक्ष दशकानुदशके केंद्रात आणि राज्यांत सत्तेत होते, मात्र आज नागरिकांच्या आयुष्यात बदल दिसत असताना, हेच लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांची प्राथमिकता देश नव्हे, तर स्वतःचा खिसा भरण्याची आहे. आर्थिक असमानतेवर बोलणाऱ्या काही विरोधी खासदारांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, जे स्वतःला राजा म्हणवून घेण्यात अभिमान बाळगतात, ते आर्थिक विषमतेची भाषा करतात, हे दुर्दैवी आहे.
घुसखोरीवर कठोर भूमिका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगातील प्रत्येक देश अवैध नागरिकांविरोधात कारवाई करत आहे. मात्र काहीजण येथे घुसखोरांची बाजू घेत आहेत. घुसखोरांमुळे देशातील युवकांची रोजगार संधी आणि आदिवासींची जमीन हिरावली जात असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली.
भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर
पंतप्रधानांनी सांगितले की, देशातील जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसच्या चुका दुरुस्त करण्यातच आमची मोठी ताकद खर्च झाली. सरकारने ‘फ्यूचर रेडी पॉलिसीज’ राबवल्यामुळे देश आज रिफॉर्म एक्सप्रेसवर धावत आहे, असे त्यांनी म्हटले.
भारत विश्वासार्ह जागतिक भागीदार
जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत आहे आणि भारताकडे सर्वांच्या केंद्रस्थानी आहे. आज भारत ग्लोबल साऊथचा बुलंद आवाज बनला असून, अनेक देशांसाठी विश्वासार्ह भागीदार ठरल्याचे त्यांनी नमूद केले. एमएसएमई क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एमएसएमई नेटवर्क जितके मजबूत, तितकी देशाची आर्थिक ताकद अधिक. सरकारने या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळेच ईयू आणि अमेरिका यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत ट्रेड डील्स शक्य झाल्या, असा दावा त्यांनी केला.