पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर २४ तासांच्या आतच केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता भारतात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची आयात करणे महाग होणार असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेतील किमतींवर होणार आहे.
सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६% वरून १५% पर्यंत वाढवले आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर १०% मूलभूत सीमा शुल्कासह ५% उपकर आकारला आहे. कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरासह सीमा शुल्क १५% पर्यंत पोहोचले आहे.
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
या निर्णयामागील प्रमुख कारणे
रुपयाची घसरण रोखणे- सोन्याची आयात कमी करून परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
आयात कमी करणे- भारत हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.
तस्करीची भीती- सीमा शुल्कात वाढ केल्यामुळे मौल्यवान धातूंची अवैध तस्करी वाढू शकते, अशी भीती काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी २०२४ च्या अर्थसंकल्पात शुल्क कमी केल्यामुळे तस्करीच्या घटनांमध्ये घट झाली होती.
भारत हा जगातील सोन्याच्या सर्वात मोठ्या उपभोक्त्यांपैकी एक आहे. भारत सरकारने यापूर्वी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील सीमा शुल्क १५% वरून ६% पर्यंत कमी केले होते. या निर्णयामुळे सोने आणि चांदीच्या आयातीत विक्रमी वाढ झाली होती. आता, नव्या निर्णयानुसार, सीमा शुल्क २०२४ च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या पातळीवर परत आले आहे.
