ऑपरेशन सिंदूरमुळे हवाई, सायबर क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:52 IST2026-05-07T08:50:41+5:302026-05-07T08:52:08+5:30
मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त तज्ज्ञांनी केले भाष्य

ऑपरेशन सिंदूरमुळे हवाई, सायबर क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविणे आवश्यक
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाविरोधातील भारताच्या प्रतिसादाच्या ‘रेड लाईन्स’ नव्याने आखल्या गेल्या असून हवाई शक्तीचा संयुक्त वापर, ड्रोन तंत्रज्ञानाची मजबुती आणि सक्षम संपर्क व्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
६-७ मेच्या मध्यरात्री एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या या कारवाईला उजाळा देताना निवृत्त एअर कमोडोर गौरव त्रिपाठी सांगितले की, भविष्यातील युद्ध आकाशातच नव्हे तर सायबर, माहिती आणि मानसिक क्षेत्रातही लढले जाईल.
परदेशी कोट्यातून डल्ला! रेल्वेचा १२१ प्रवाशांना मोठा दंड; पाहा कसा होत होता तिकिटांचा गैरवापर
भविष्यातील युद्ध बहुआयामी असेल
निवृत्त लेफ्टनंट जनरल व सेंटर ऑफ लँड वॉरफेअर स्टडीजचे महासंचालक असलेल्या दुष्यंत सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने धोरणात्मक संयमापासून ते धोरणात्मक सक्रियतेपर्यंत वाटचाल केली आहे. आता कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला त्वरित आणि प्रभावी प्रत्युत्तर देण्याची आणखी जय्यत तयारी आवश्यक आहे. भविष्यातील युद्ध बहुआयामी असेल, ज्यात अवकाशापासून समुद्राखालील क्षेत्रांपर्यंत सर्व स्तरांवर कारवाया होतील.
संरक्षण दलात समाविष्ट होणार प्रगत साधनसामुग्री
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते.
८८ तास चाललेला हा संघर्ष १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये समझोता झाल्यानंतर थांबला. या कारवाईनंतर संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रे, अतिरिक्त एस-४०० प्रणाली, ड्रोन, अँटी-ड्रोन यंत्रणा आणि इतर लष्करी साधनसामग्री खरेदीला मंजुरी दिली तज्ज्ञांनी नमूद केले.
व्यापक क्षमतेची गरज : भारतीय वायुदलाने ड्रोनविरोधी क्षमतेत वाढ केली असली तरी ती अधिक व्यापक करण्याची गरज आहे. तसेच एस-४००, ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांसारख्या प्रणालींनी हवाई संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.