Rahul Gandhi : "राहुल गांधी स्वतःला कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का?"; भाजपाचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 20:14 IST2026-03-14T20:13:18+5:302026-03-14T20:14:57+5:30
BJP And Rahul Gandhi : चहा-बिस्किट खातानाचे राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Rahul Gandhi : "राहुल गांधी स्वतःला कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का?"; भाजपाचा खोचक सवाल
देशभरातील घरगुती गॅस (LPG) प्रश्नावरून संसद भवनात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान चहा-बिस्किट खातानाचे राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाटणा येथील बिहार भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश यांनी लोकसभा विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधला.
हे संसदेच्या नियमांचं उघड उल्लंघन असल्याचं सांगत सत्तेपासून दूर राहिल्यामुळे राहुल गांधींचं मानसिक संतुलन बिघडल्याचं म्हटलं आहे. गुरु प्रकाश यांनी राहुल गांधींचं हे पाऊल बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचा अपमान असल्याचं देखील म्हटलं आहे. १२ मार्च २०२६ हा दिवस लोकशाहीसाठी 'काळा दिवस' असल्याचं सांगत ते म्हणाले की, राहुल गांधी संसदेत निषेधाच्या नावाखाली मकर द्वारवर बसून पिकनिक साजरी करत होते आणि चहा पीत होते.
लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट मनाई केलेली असतानाही केलेलं हे कृत्य संसदेच्या 'नियम ३८४' चे थेट आणि उघड उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला. गुरु प्रकाश यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मानसिकतेवर काही प्रश्न उपस्थित केले. कायद्याच्या नजरेत सर्व नागरिक समान आहेत, मग राहुल गांधी स्वतःला देशाचा कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का? असा सवाल त्यांनी विचारला.
टोला लगावत म्हटलं की, "जेव्हा एखादा निर्णय काँग्रेसच्या बाजूने लागत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी न्यायालय आणि निवडणूक आयोग दोषी ठरतात. आता तर ते थेट लोकशाहीच्या मंदिराचाच अपमान करत आहेत. खरं तर, प्रदीर्घ काळ सत्तेपासून दूर राहिल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. देशाला अशा लोकांपासून सावध राहण्याची नितांत गरज आहे."
एलपीजीच्या टंचाईवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपा प्रवक्त्यांनी सरकारची बाजू ठामपणे मांडली. ते म्हणाले की, २०१४ पूर्वी देशातील माता-भगिनींना धूर येणाऱ्या चुलीवर जेवण बनवावं लागत होतं, परंतु पंतप्रधान मोदींच्या 'उज्ज्वला योजने'ने प्रत्येक घराला गॅसशी जोडलं आहे. देशात गॅस आणि तेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती संसदेत मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्याची परिस्थिती काँग्रेसच्या कार्यकाळाच्या तुलनेत कितीतरी पटीने चांगली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.