मोठी बातमी: आसाममध्ये सुखोई लढाऊ विमान रडारवरून बेपत्ता; शोधमोहीम युद्धपातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 22:21 IST2026-03-05T22:19:42+5:302026-03-05T22:21:49+5:30
IAF Sukhoi Jet: भारताच्या सुरक्षेचे कवच मानले जाणारे भारतीय वायुसेनेचे शक्तीशाली सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान आसाममध्ये गुरुवारी संध्याकाळी ...

मोठी बातमी: आसाममध्ये सुखोई लढाऊ विमान रडारवरून बेपत्ता; शोधमोहीम युद्धपातळीवर
IAF Sukhoi Jet: भारताच्या सुरक्षेचे कवच मानले जाणारे भारतीय वायुसेनेचे शक्तीशाली सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान आसाममध्ये गुरुवारी संध्याकाळी बेपत्ता झाल्याने संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आसाम येथून उड्डाण केल्यानंतर या विमानाचा तळाशी असलेला संपर्क अचानक तुटला असून, विमानाचा आणि त्यातील वैमानिकांचा शोध घेण्यासाठी वायुसेनेने मोठी बचाव मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी नियमित सरावासाठी या विमानाने जोधपूर तळावरून झेप घेतली होती. मात्र, रात्री ७ वाजून ४२ मिनिटांनी विमानाचा ग्राऊंड कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला आणि ते रडारवरून गायब झाले. कार्बी आंगलाँग जिल्ह्याच्या परिसरातून हे विमान जात असताना ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत.
स्थानिक रहिवाशांनी ऐकला स्फोटाचा दावा
अधिकृतपणे अद्याप विमानाचा शोध लागलेला नसला तरी, कार्बी आंगलाँग परिसरातील काही स्थानिकांनी आकाशात मोठा स्फोट ऐकल्याचे सांगितले आहे. यामुळे विमान कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायुसेनेने तातडीने अलर्ट जारी केला असून एक विशेष पथक तपासासाठी आणि मदतीसाठी आसामकडे रवाना करण्यात आले आहे.
सुखोईची ताकद आणि सुरक्षा
२००० सालाच्या सुरुवातीला भारतीय वायुसेनेत दाखल झालेले सुखोई Su-30MKI हे ४.५ जनरेशनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाने विकसित केलेले हे विमान भारतीय, फ्रेंच आणि इस्रायली तंत्रज्ञानाचे उत्तम मिश्रण मानले जाते. दोन इंजिन असलेल्या या विमानाची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सक्षम असते, तरीही ते बेपत्ता झाल्याने वायुसेनेने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे.
सर्च ऑपरेशन सुरू
वायुसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत माहिती देताना सांगितले की, "विमानाचा शोध घेण्यासाठी सर्च आणि रेस्क्यू मिशन सुरू करण्यात आले आहे. बेपत्ता वैमानिकांचा आणि विमानाचा अचूक ठावठिकाणा मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत." सध्या दुर्गम भागातील खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणत्या कारणामुळे संपर्क तुटला, याचा तपास सुरू आहे. सर्वजण वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे.